जाता जाता एक नजर इथेही........

Thursday, April 30, 2009

यथा राजा तथा अधिकारी

आयएस अधिकारी टी चंद्रशेखर ठाण्याचे आयुक्त असताना त्यांची कारकीर्द बरीच गाजली. काहींच्या मते त्यांनी ठाणे शहराचा संपूर्ण कायापालट केला. अत्यंत कार्यक्षम सचोटीचा अधिकारी अशी प्रतिमा जनमानसात होती. तर काहींच्या मते शहराचे नागरीकरण/आधुनिकीकरण ह्या नावाखाली मनमानी केली. जेव्हां एखादा अधिकारी बेधडक कृती करतो तेव्हा दोन्ही बाजूने मतप्रवाह वाहणारच. कोणाच्याही दबावाला बळी पडणारे लोक फारच दुर्मिळ आहेत.

चंद्रशेखर यांचे काम चांगले का वाईट- हे पाहणाऱ्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. ज्यांची दुकाने, घरापुढचे अंगण रस्ता रंदीत गेले आहे ते नक्कीच बोटे मोडणार. परंतु मुळात वरिष्ठ अधिकारी कुठल्याही प्रकारची मनमानी-मग ती स्वत:च्या स्टाफची असली तरीही खपवून घेणारा नसेल तर जनसामान्यांना आवडतो. चंद्रशेखर यांच्या हाताखालील लोकांना हे चांगलेच माहीत होते. जर राजा कार्यक्षम असेल तर जनतेला किती उपयोग होतो ह्याचे हे एक छोटेसे उदाहरण.

ठाण्याच्या नीतिन कंपनी जवळच्या उड्डणपुलाचे काम सुरू होते. आमचे घर हायवेच्या अलीकडे. रस्त्याच्या दोन्हीबाजूने मध्यभागी नेहमीच क्रेन्स, ट्रक्स, पुल बांधण्यासाठी लागणारी अनेक मशीन्स उभी असत. ह्या कामामुळे नागरिकांच्या दररोजच्या कामात फार अडथळे येत होते, तरीही पूल पूर्णं झाल्यानंतरच्या फायद्याकडे डोळे ठेवून लोक सहन करीत होते. रविवारी काम बंद असे. ही सगळी वाहने जिथे असतील तिथे सोडून देऊन कर्मचारी निघूनजात. मग ट्रॅफिक चा गोंधळ ठरलेला. लोक तेवढ्यापुरते बोंबाबोंब करीत अन दमले की चालू पडत. ह्या कामामुळे आवाजाचे प्रदूषण धूळ हे सगळ्यांचा अंत पाहत होते. त्यातच,

एका रविवारी सकाळी नऊच्या आसपास एकाएकी हॉर्न चा कर्कश आवाज आला, येतच राहीला. आत्ता थांबेल मग थांबेल, पण दोन मिनिटे होऊन गेली तरी चालूच. बरेच लोक गॅलरीमध्ये येऊन शोध घेऊ लागले की हा मूर्खपणा कोण करते आहे. आम्हीही पाहत होतो. पण पत्ता लागेना. पंधरा मिनिटे झाली हॉर्न चालूच. डोके दुखायला लागले. तोवर एवढे लक्षात आले होते की हॉर्न चिकटला आहे. काही पोरे पार्क केलेल्या प्रत्येक गाडीजवळ जाऊन पाहू लागली. करता करता शोध लागला एकदाचा. रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या क्रेनचा हॉर्न टाहो फोडून आक्रंदत होता. झाले, आज रविवार असल्याने सुटी म्हणजे पूर्ण चोवीस तास हा आवाज आजूबाजूच्या समस्त जनतेला बहिरे करणार होता.

आता बरेच लोक क्रेन भोवती गोळा होऊन चर्चा करत होते. काही पोरे वर चढून खिडकी उघडी आहे का ते पाहत होती. तासापेक्षा जास्त वेळ गेला पण उपाय सापडत नव्हता. डोके अगदी पिकले. तिरिमिरीतच मी उठले अन ठाणा टेलिफोन एक्सचेंजला फोन करून चंद्रशेखरांचा नंबर मागितला. नेहमीप्रमाणे मला ऑपरेटरने उडवलेच. पुन्हा नंबर फिरवला अन प्रथमच सांगितले की मला नंबर हवा आहे आणि तुम्ही तो देता जर फोन ठेवून दिला तरी मी तो मिळवेनच आणि मग त्यावेळी तुमचीही तक्रार करेन. खरे तर ह्या धमकीत काहीच तथ्य नव्हते पण कदाचित माझ्या आवाजातला संताप किंवा ऑपरेटरलाच वाटले असेल देऊन टाकावा. मला तिने चंद्रशेखर यांच्या सेक्रेटरीचा नंबर दिला.

सेक्रेटरींना फोन लावला तर आधी दुसऱ्याच कोणीतरी उडवाउडवी करू लागले. त्या दिवशी माझ्या अंगात कसला संचार झाला होता कोण जाणे मी त्या माणसाला सेक्रेटरीला फोन देण्यास भाग पाडले. त्यांना काय झाले आहे ह्याची कल्पना दिली. त्यांनी काय करता येईल ते पाहतो असे आश्वासन दिले. परंतु तेवढ्याने काही होणार नव्हते म्हणून मी पुन्हा एकदा त्यांच्याकडे मला आयुक्तांशीच बोलायचे आहे असा धोषा लावला. तसे त्यांनी मला पालिकेच्या एका इंजिनियर चा नंबर दिला, म्हणाले मी प्रयत्न करतोच पण तुम्हीही इथे फोन करा.

इकडे रस्यावर प्रचंड गर्दी जमलेली. अर्धे लोक कानात बोटे खुपसून तर काही क्रेनची काच तोडण्याच्या विचारात. मी त्या इंजिनियरचा नंबर फिरवला. पलीकडून एक बाई बोलत होती, ती म्हणे ते फोन घेऊ शकत नाहीत. सत्यनारायणाची पूजा सुरू आहे. मी तिला सांगितले की तितके महत्त्वाचे काम आहे म्हणूनच त्यांच्याशी बोलायचे आहे. दोन मिनिटांनी ते आले फोनवर. मी थोडक्यात काय घडते आहे ते सांगितले आणि चंद्रशेखर यांच्या सेक्रेटरीने तुमचा नंबर दिला असून तुम्हीच ह्या कामाचे इनचार्ज असल्याने हे काम तुम्हीच करू शकता असेही सांगितले. इंजिनियरने घरात किती गडबड आहे, त्यात रविवार असल्याने पाहतो असे गुळमुळीत उत्तर देऊन मला वाटेला लावले.

आता पुढे काय करावे? आवाज बंद होईल अशी चिन्हे दिसत नव्हती. मनात एकच आशा होती की चंद्रशेखर यांच्या दराऱ्यामुळे कदाचित हे काम होईल. आणि काय आश्चर्य खरोखरच पंचवीस मिनिटांत पालिकेचे दोन कर्मचारी कुठुनसे उगवले आणि एकदाचे त्या चिकटलेल्या हॉर्नचे मुस्कट दाबले. हूश्श्श... झाला बंद. दोनसव्वादोन तास चाललेला गोंधळ शांत झाला. पाच मिनिटात फोनची बेल वाजली, फोनवर चंद्रशेखरांचे सेक्रेटरी होते. आवाज थांबला का? तुमचे काम झाले ना? असे विचारीत होते. ह्यापुढेही कधीही काहीही अडचण आल्यास फोन करावा हेही त्यांनी आवर्जून सांगितले. त्यांचे आभार मानून फोन ठेवला तर इंजिनियरचा फोन आला, त्यानेही हेच विचारले. तुमच्या सत्यनारायणाच्या पूजेच्या गडबडीतही तुम्ही काम केलेत ह्याचे मनापासून आभार असे म्हणून फोन ठेवला.

ह्या सगळ्यातून पुन्हा एकदा प्रूव्ह झाले, जर मुख्य अधिकारी चांगला असेल तर हाताखालच्यांनाही प्रेरणा मिळते. किमान धाक तरी नक्कीच असतो. सामान्य माणसाचीही दखल घेतली जाते.

3 comments:

  1. anubhav chan, ase anbhav kadhihi visru shakat nahi hech khare

    ReplyDelete
  2. तुम्ही मला पण लिहायला एक नविन विषय आठवण करुन दिलात. धन्यवाद.. छान आहे पोस्ट.. एखाद्या माणसाणे जर कांही ठरवले तर तो कांहीही करु शकतो..

    ReplyDelete
  3. हो ना, धन्यवाद प्राजक्त.

    नक्कीच,माझे कोण ऐकणार किंवा मी कसे करू शकणार ही भावना आपल्याला परावृत्त करते. तिला थारा देता नये. प्रतिक्रियेबद्दल आभार महेंद्र.

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !