जाता जाता एक नजर इथेही........

Wednesday, May 27, 2009

अशीही एक वटपौर्णिमा.

नेहा-अजयचे नुकतेच लग्न झालेले. लाडात वाढलेल्या नेहाचे सासरीही कोडकौतुक होत होते. लग्न होण्याआधीच मुलासाठी वेगळा ब्लॉक घेऊन ठेवल्यामुळे राजा-राणीचा संसार सुरू झाला. दोघेही नोकरी करत होती. स्वयंपाक प्रकार फारसा नव्हताच. रास्तही होते. प्रेमाचे फुलपाखरी दिवस पुरेपूर सार्थकी लागत होते. अजय समजूतदार होता, आई व नेहा ह्या दोघींनाही नीट हँडल करीत होता. आईचा टोकाचा आग्रही स्वभाव जाणून होता. बाबांसारखे वाद नको म्हणून गप्प राहणे इतके दिवस चालून गेले असले तरी आता नेहमीच तसे करता येणार नव्हते. नेहा आपल्याच विश्वात रमणारी व कोणालाही मुद्दामहून खेटायला न जाणारी होती.

सगळे आलबेल असताना एके दिवशी आईचा फोन आला. " आम्हाला दोघांना आता एकटे राहायचे नाही व तुम्हाला मोठे घर घ्यायचे आहे. तेव्हा आमचे घर विकून टाकू व तुम्हाला हवे तिथे मोठा फ्लॅट घेऊ पण बरोबर राहू. " झाले. नेहा वैतागली, संतापली, बिथरली. सहा महिन्यापूर्वी तर अगदी गोडगोड बोलत होत्या, " अग वेगळे राहिल्याने सगळ्यांचे स्वातंत्र्य अबाधित राहील व भांड्याला भांडी आपटणार नाहीत. आम्हाला मोठे घर हवे हे निव्वळ निमित्त, शिवाय येताजाता उपकार ऐकावे लागतीलच."

बाबा व अजय गोंधळले. अजय बाबांच्या मागे लागला काहीतरी तोडगा शोधा. बाबा म्हणाले तुझ्या लग्नाआधी मोठ्या शिताफीने तुझ्या आईला तिच्याच अहम च्या खोड्यांत अडकवून तुम्हाला वेगळे राहायला द्यायला वळवले होते. पण तिच्या समोर आम्हाला मोठे घर घ्यायचे आहे हे नेहाने दोन-तीनदा बोलून स्वत:च धोंडा पाडून घेतला आहे. आता कठीण आहे बाबा. नेहमीप्रमाणे आईने आपला हेका पूर्ण केला व दोन महिन्यातच दोन घरे एका मोठ्या घरात एकत्र नांदायला लागली.

इतके दिवस सुनेचे कोडकौतुक करणाऱ्या अजयच्या आईला नेहाची प्रत्येक गोष्ट खटकू लागली व ती बाबांचे डोके खाऊ लागली. बाबा आपल्या परीने वेळप्रसंग पाहून कधी सुनेची तर कधी बायकोची बाजू घेऊन घरात सामंजस्य टिकून राहावे म्हणून प्रयत्न करीत होते. एकीकडे स्वत:चे राहते घर हिच्या हट्टापायी विकून टाकले ह्याचा खेदही होत होता. इकडे नेहा जास्तीतजास्त वेळ बाहेर राहू लागली. घरी आले की जणू तुरुंगात आल्यासारखे वाटे. काहीही केले तरी दोन डोळे सतत पाठलाग करीत असतात ही जाणीव तिला छळू लागली. काही दिवस तिने सासूबाईंना खूश करायचा प्रयत्न केला पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. उलट किती नाटकी आहे भवानी, इत्यादी शेलके रिमार्क्स ऐकायला मिळाल्यावर नाद सोडून दिला.

नेहाच्या आईला थोडीफार कल्पना आलेली होतीच. तिच्या परीने ती नेहाला सबुरीने घे, दुर्लक्ष कर. साध्या साध्या गोष्टींमध्ये काहीतरी वाकडेच आहे हे शोधू नकोस असे सांगत असे. पण नेहा त्रास करून घेतच होती. अजय बरोबरही आजकाल चांगला संवाद घडत नव्हता. आईने आज अमुक केले तमुक केले हे ऐकून अजय वैतागू लागला होता हेही तिला दिसत होते. इकडे आईही मध्येच त्याला पकडून नेहाची गाऱ्हाणी करी. तुझा काहीही कंट्रोल नाही म्हणूनच ती माझ्याशी असे वागते असे सारखे त्याला बोलू लागली. इकडे आड तिकडे विहीर अशी अजयची अवस्था होऊ लागली होती.

तशात वटपौर्णिमा आली. सुनेचे आधीचे सण अगदी कौतुकाने साजरे करणारी बायको बिलकुल हालचाल करत नाही हे पाहून न राहवून बाबांनी विचारले, " अहो, विसरलात का? वटपौर्णिमा आहे उद्या. " त्यावर फणफणत, " माहिती आहे बरं का, अजून मी विसरभोळी नाही झालेय. नशीब माझे. नाहीतर काय काय अंगाला चिकटवले असतेत कोण जाणे. जाणार आहे मी फेऱ्या मारायला. तुम्हाला नकोच असेन पण मी बरी सोडेन तुम्हाला. " ह्या माऱ्याने बाबांनी कोपरापासून हात जोडून, " अग बाई, विषय कुठून कुठे नेतेस गं? अग मलाही तूच हवीस, दुसरी तुझ्यापेक्षा कजाग निघाली तर ... " असे म्हणून मोठ्याने हसून बाबांनी वातावरण थोडे हलके करायचा प्रयत्न केला. आणि नवल म्हणजे चक्क आई हसल्या.

" बरं, बरं. कळतात हो मला तुमचे टोमणे. मग मघाशी कशाला आठवण करून देत होतात? " " अग, नेहाची पहिलीच वटपौर्णिमा आहे ना? मग तिला साडी किंवा काहीतरी दागिना घेणार आहेस की नाही? का आधीच आणूनही ठेवले आहेस? तसे तुझे नियोजन अचूक असतेच म्हणा. " बाबांनी अजूनच चढविले. " हे बघा, मघाशीच माझ्या लक्षात आले होते ही संभाषणाची गाडी कुठे वळणार आहे ते. तुम्ही मला हरभऱ्यावर चढवताय हेही समजतंय मला. पण त्याचा काही उपयोग होणार नाही. मी नेहाला द्यायला काहीही आणलेले नाही आणि आणणारही नाही. आणि ती कार्टी कुठे पुजणार आहे वडाला. उलट मलाच कसा मूर्खपण करताय म्हणून दोन शब्द सुनावेल. " असे म्हणून आई तिथून उठून गेल्या. बाबा हताशपणे बसून राहिले.

रात्री नेहा-अजय खूप उशीरा आले. सगळी संध्याकाळ आई करवादत राहिल्या, " बघा, ना लेकाचा पत्ता ना सुनेचा. ठरवून गेली असतील हादडायला. अजयने नाही तरी नेहाने नको का कळवायला? एक तर मरमर कष्ट करून ह्यांच्यासाठी गरम जेवण करून ठेवायचे आणि हे जेवून आले तर पुढचे दोन दिवस ते शिळे तुकडे आम्ही गिळायचे. ते काही नाही आज येऊच देत, चांगली खरड काढते. तुम्ही त्यांची बाजू घ्याल तर खबरदार. " आज ही बाई गप्प बसणार नाही ह्याची खात्री वाटल्याने बाबांना फार अस्वस्थ वाटायला लागले. नेहा-अजय आले तोवर बाबांचे बिपी फारच वाढले होते.

अजय-नेहाला पाहिल्याक्षणी आईंनी तोंड सोडले, " अरे किती वेळ? साधा एक फोनही करता येत नाही का तुम्हाला? काय गं नेहा, तो सेलफोन नुसता मिरवायला घेतला आहेस का? " काहीतरी झणझणीत उत्तर द्यावे असा विचार करत नेहा वळली तोच तिची नजर बाबांवर गेली. " बाबा, अहो बाबा असे का बघताय? अरे अजय बघ रे, बाबांना बरे नाहीये का? " असे म्हणत जवळजवळ धावतच ती बाबांजवळ पोचली. अजयही पाहू लागला. आईंना वाटले की वाद वाढू नये म्हणून बाबा ढोंग करताहेत. त्या एकदम ओरडून म्हणाल्या, " काही झालेले नाही त्यांना. मेली सदानकदा सुनेची बाजू घेत राहा. मीच काय ती वाईट आहे ह्या घरात. " इकडे तोवर बाबांची शुद्ध हरपली होती. ते पाहिल्यावर मात्र आई घाबरल्या." अग बाई म्हणजे हे ढोंग करत नव्हते तर, माझे मेलीचे लक्षच नाही गेले." हे सगळे आपल्यामुळेच झालेय ह्या जाणीवेने त्या हवालदील झाल्या.

नेहाने पटकन पाणी आणून बाबांना पाजण्याचा प्रयत्न केला. पण उपयोग झाला नाही. तशी तिने तिच्या डॉक्टर मित्राला फोन लावून बिपी वाढले असावे त्यानेच बहुतेक बाबा बेशुद्ध पडले असावेत हे सांगितले. त्याने सांगितल्याप्रमाणे बाबांना गाडीत घालून सगळेजण त्याच्या हॉस्पिटलमधे गेले. लागलीच उपचार मिळाल्याने बाबांना थोड्याच वेळात शुद्धही आली. बिपीही खाली येत होते. आता काही धोका नव्हता. आजची रात्र राहू दे इथेच उद्या सोडतोच घरी असे डॉक्टरने सांगितल्यानंतर नेहाने अजय व आईला घरी जाण्यास भाग पाडले व ती स्वतः बाबांजवळ बसली.

हा सगळा वेळ आई खूप कष्टी झाल्या होत्या. किती वेळा मला हे समजावून सांगतात पण मी माझेच म्हणणे रेटत राहते. स्वतःचाच हेका चालवण्याच्या स्वभावाने सगळ्यांना त्रास देते. उद्या मला जर काही झाले तर नेहा सोडाच माझा पोटचा मुलगाही प्रेमाने धावायचा नाही. काल आलेली पोर पण नुसते बाबांच्या चेहऱ्याकडे पाहून तिला कळले, खरे तर मला कळायला हवे होते. हे दोघे आले नसते तर ह्यांचे काही खरे नव्हते. उद्याची वटपौर्णिमा कशी केली असती मी. प्रत्येकाच्या स्वभावात दोष असायचेच.

मन जह्यरी जह्यरी
याचं न्यारं रे तंतर
अरे इचू साप बरा
त्याले उतारे मंतर... , माझे असेच चालले आहे हल्ली. सारखे नेहा कुठे तावडीत सापडतेय हेच मी शोधत असते. कुचकट बोलून पोरीला भंडावून सोडलेय, आता तर ती माझ्याकडे पाहात सुद्धा नाही. मग तिला वाटेलच ना,
माय म्हण् ता म्हण ता
होट होटाशी हो मिळे
सासू म्ह ण ता म्ह णता
गेला तोन्डा वते वारा ... , ह्या अश्या ओव्या नुसत्या तोंडपाठ. काय उपयोग त्यांचा, डोक्याचे झालेय भूसकट. पण आता नाही. थोडक्यात निभावलेय. ह्यापुढे सगळ्यांना आपण हवेसे कसे वाटू हेच पाहायचे. होईल थोडा त्रास सुरवातीला पण आता बदलायलाच हवे. कोण जाणे पुन्हा अशी संधीही मिळेल न मिळेल.

दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजताच डॉक्टरने बाबांना घरी सोडले. बाबांना घरी आणून चहा देऊन बेडवर झोपवून खोलीबाहेर पडणाऱ्या नेहा-अजयला आईंनी हात धरून बसवून घेतले. सोनेरी बुट्ट्यांची हिरवीकंच गर्भरेशमी सुंदर साडी व स्वतःची सोन्याची वाकी नेहाला देऊन तिची ओटी भरली. आग्रहाने नेहाला साडी नेसायला लावून स्वतःच्या हाताने वाकी घातली. आईच्या नजरेतला बदल पाहून नेहा-अजयच काय पण बाबाही चकित झाले. तशी आई पटकन म्हणाल्या, " अरे तुम्ही सगळे असे भूत बघितल्यासारखे का पाहताय माझ्याकडे? नाही म्हणजे मी थोडी खडूसपणे वागते... बरं खूपच खडूसपणे वागते. पण आता मी नेहाची आई होऊन दाखवते की नाही ते पाहाच. आणि नेहा हे मी मनापासून सांगतेय बरे का. "

हे ऐकून नेहाला खूप आनंद झाला. शिवाय वाकी आणि साडीचा आनंदही होताच भरीला. एकदम मोकळेपणाने तिने प्रथमच आईंना मिठी मारली व म्हणाली, " आज मला माझे, माझ्या माणसांच्या प्रेमाने भरलेले घर मिळाले. चला आपण दोघीही जाऊन वडाला नमस्कार करून येऊ. म्हणजे ह्या बापलेकांना आपल्यापासून जन्मोजन्मी सुटका नाही आणि आपल्या दोघींनाही एकमेकीपासून, खरं ना? "

त्या दोघी हसत हसत गेल्या आणि बाबा तटकन उठून बसले. तसा खो खो हसत अजय म्हणाला, " अहो जरा हळू. बरं नाहीये ना? बाबा, मानले तुम्हाला. काय जबरी नाटक केलेत. नेहा तर नेहा पण चक्क आईही फसली. आणि खरं सांगतो, अहो सुरवातीला तर मीही फसलो होतो. तुम्ही डोळा मारलात म्हणून. कमाल म्हणजे त्या नेहाच्या मित्राला-डॉक्टरलाही पटवलेत. आता ह्या दोघी निदान काही वर्षेतरी आपल्याला सुखाने जगू देतील. अर्थात मातोश्रींचा काही भरवसा नाही पण काही काळ तरी ..." बाबा आनंदाने मान डोलवत नुसतेच गालातल्या गालात हसत राहिले.

7 comments:

  1. साधी,सरळ छान कथा. उगाच ओढून ताणून रडकी/टेन्शन न केल्यामुळे जास्त आवडली. पु.ले.शु.

    संपदा दाते.

    ReplyDelete
  2. संपदा, प्रसाद धन्यवाद.

    ReplyDelete
  3. rachleli ki anubhavleli. Pan aahe ekdam zakkas!!!! Great!! Ajun kahi asha katha ahet ka?

    ReplyDelete
  4. Ekdam Zakkas. Pan kay ho hi katha rachaleli hoti ki anubhavleli. Any way Greaaaaat!!!

    ReplyDelete
  5. प्रमोद धन्यवाद. कथा रचलेली आहे, अनुभवलेली नाही. :) अजून काही कथा ना....हळूहळू टाकतेय. :)

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !