जाता जाता एक नजर इथेही........

Friday, May 29, 2009

फक्त तीस रुपयांसाठी...

आमच्या काश्मीरच्या ट्रीपमध्ये खूप मजा येत होती पण त्याचबरोबरीने बऱ्याच घटनाही घडत होत्या. युसमर्ग पाहून झाल्यावर दुसऱ्या दिवशी खिलनमर्गला जायचे ठरले. सकाळी लवकर उठून आवरले. वीरनने केलेल्या सुंदर नाश्त्याचा समाचार घेऊन आम्ही सगळे बस घेऊन खिलनमर्गच्या पायथ्याशी पोचलो. सासू-सासरे व मामा-म्हणजे आमच्या ट्रीपचे संचालक ह्यांनी आधीच पाहिले असल्याने तुम्ही जाऊन या आम्ही इथेच बाजारात भटकतो. असे म्हणून ते गेले. राहिलो आम्ही तीन फॅमिलीज. टोळेकाका व काकूही तिनचार वेळा जाऊन आले होते परंतु त्यांचा उत्साह दांडगा होता. त्यामुळे ते दोघे, आम्ही दोघे व जयवंत फॅमिली- अनिल, शुभा व त्यांची चार वर्षाची जुळी गोड मुले-अभिषेक व अभिजित.

टोळेकाका म्हणाले मी व कमू घोड्यावरून जाणार आहोत. बाकी आम्हा सगळ्यांना स्लेजचा (
Sledges ) अनुभव घ्यायचा होता म्हणून आम्ही आमच्या आसपास रेंगाळत असलेल्या स्लेजवाल्यांशी बोलू लागलो. काश्मीरमध्ये फक्त काहीच महिने पर्यटक येत असल्याने जोतो जास्तीत जास्त कमाई करण्याच्या मागे. तरीही भोवती स्लेजवाल्यांची गर्दी असूनही त्यांनी आम्हाला अजिबात भंडावले नाही की एकमेकांशी हमरीतुमरीवर आले नाहीत. आम्हाला चार जणांची गरज होती. ज्यांच्याशी आम्ही भाव केला तेवढेच स्लेजवाले बोलत होते. बाकीचे शांतपणे उभे राहिले. नवऱ्याला मुळातच घासाघीस करणे ह्या प्रकाराचा तिटकारा असल्याने त्याने दोन मिनिटात दोघांना बुक केले. चाळीस रुपये प्रत्येकी आणि स्वखुशीने टीप द्यायची. अनिल मात्र बराच वेळ हो नाही करत होता. शेवटी आम्ही जे ठरवले त्याच भावाने त्यानेही दोघांना ठरवले. एवढे होईतो ऊन बरेच चढले.

टोळेकाका व काकू घोड्यावरून निघाले आणि आम्ही सगळे चालत, उड्या मारत. त्यावर्षी प्रचंड बर्फवृष्टी झाल्याने खिलनमर्ग संपूर्णपणे मढले होते. अगदी पायथ्याशी असलेल्या बस स्टँडही बर्फाने माखला होता. पांढराशुभ्र भुसभुशीत चमकणारा बर्फ अतिशय सुंदर दिसत होता. त्यामुळे थंडी असूनही छान आल्हाददायक वाटत होते. मी दोघा अभींना बोटाला धरून अक्षरशः उंडारत होते. स्लेजवालेही आमच्याबरोबर चढत होतेच. तासाभरात आम्ही सगळे अगदी वर जाऊन पोचलो. खूप उंच चढ आणि हळूहळू विरळ होत जाणारा ऑक्सिजन ह्याने दमलो, घामेजलो. बर्फात चेहऱ्यावरून ओघळणाऱ्या घामाचे फोटो काढून झाले. मग तो गोठतो का पाहूया म्हणून दोन मिनिटे टेकलो. सकाळचा नाश्ता कधी जिरला तेही कळले नाही. प्रचंड भूक व तहान लागलेली. पाणीही आणले नव्हते- त्यावेळी ह्या प्लॅस्टिकच्या बॉटल्सचे पेव फुटलेले नव्हते. आता काय करावे, असे म्हणत असतानाच..

नवऱ्याला थोडी दूरवर एक छोटिशी झोपडी असल्यासारखे वाटले. तो पळतच पाहायला गेला. मोठ्ठे स्माईल घेऊन परत आला व म्हणाला , " चला पटकन सगळे, देवानेच पाठवलेय त्याला आपल्यासाठी. " पोरे तर केव्हाच पळाली, आम्हीही मागोमाग पोचलो. पाहतो तो काय अगदी नवरा म्हणाला तसेच होते. एक काश्मिरी छोले व बटाट्याचे परोठे तयार करून बसला होता. ह्या दोहोंचा सुंदर वास आसमंतात पसरला होता. पोटातली खवळलेली भूक तोंडावाटे टपकायला लागली. अहाहा!! आज आमचे लक फारच जोरावर होते तर. त्याने अगदी अगत्याने सगळ्यांना भरभर वाढले. बर्फावरच बसून चवीचवीने आम्ही सणसणीत छोले व लुसलुशीत तुपाने माखलेल्या परोठ्यांचा समाचार घेतला. त्याच्याकडे पाणीही होते त्यामुळे अजूनच शांती झाली. त्यावर अमृततुल्य मसालेदार चहा पिऊन तृप्त झालो. फक्त सात-आठ माणसांना पुरेल इतकेच अन्न त्याने बनविले होते. ते आम्ही संपवल्याने तोही खूश होऊन पैसे घेऊन निघून गेला. माझ्या नवऱ्याने त्याला अंमळ जास्तच पैसे देऊ केले. इतका आनंद कद्रूपणे वागून कधीही फेडायचा नसतो हे त्याचे म्हणणे बरोबरच होते.

मग भरल्या पोटी तृप्त मनाने आम्ही दोनतीन तास तिथे हुंदडलो. बर्फाचे गोळे फेकून मारामारी केली. लोळलो, पडलो-झडलो. पुन्हा उठून तेवढ्याच उत्साहाने खेळलो. करता करता चार वाजले. आता खाली उतरायला हवेय नाहीतर बस जायची हे लक्षात आले. हा सगळा वेळ स्लेजवाले बाजूला बसून आमची गमत पाहत होते. त्यांना दररोजचीच सवय असल्याने एकीकडे त्यांच्या गप्पाही सुरू होत्या. आम्हाला निघालेले पाहून एक एक जण प्रत्येकाकडे आला. टोळेकाका-काकू तोवर निघालेही होते. स्लेजवरती बसताना स्लेजवाला पुढे बसणार आणि एका माणसाने त्याच्या मागे त्याला घट्ट धरून बसायचे की तो घसरत आपल्याला खाली घेऊन जातो. ह्यात स्पीड चांगलाच जाणवतो. खूपच धमाल येते. आधी कधीच असे केलेले नसल्याने पडायची थोडी भीती असते खरी पण हे स्लेजवाले एकदम तरबेज असतात. शिवाय त्यांना बक्षिसी हवीच असते त्यामुळे ते अगदी सांभाळून नेतात.

आम्ही सगळे एकेकाच्या मागे बसलो. अनिल-शुभा प्रत्येकी एक अभी घेऊन बसले. निघालो. मी तर अगदी जीव मुठीत घेऊन बसलेली. प्रथम त्या स्लेजवाल्याचे जाकीट धरलेले. एकदा का स्लेजने स्पीड पकडल्यावर कसले जाकीट धरतेय त्या स्लेजवाल्याला घट्ट धरले. नवरा खोखो हसत होता. म्हणाला, " मी तुला आधीच सांगितले होते की त्याला मिठी मारून बस. पण तू वेडाबाई... " खूपच जोरात चाललो होतो पण स्लेजवाला तयारीचा असल्याने मज्जा आली. मी आणि नवरा खाली येऊन पोचलो. दोघेही खूश होतो. नवऱ्याने आमचे दोघांचे रु.ऐंशी व बक्षिसी म्हणून अजून रु.पन्नास वर इतके पैसे देऊन स्लेजवाल्याला मोकळे केले. वर मिळालेल्या पन्नास रूपयाने तो फारच खूश झाला. तोवर अनिल-शुभा व पोरेही येऊन पोचली.

माणसे जरी चार असली तरी स्लेजवाले दोनच होते त्यामुळे त्यांनाही ऐंशीच रुपये द्यायचे होते. ते त्यांनी दिले व वर वीस रुपये बक्षिसी दिली . तिथेच आजूबाजूला आमचे स्लेजवालेही होतेच शिवाय गिऱ्हाईक मिळवण्यासाठी म्हणून बसलेले जवळजवळ चाळीसपन्नास जण होते. अनिलच्या स्लेजवाल्याने जाऊन आमच्या दोघांना विचारले तुम्हाला किती रे मिळाली बक्षिसी? आता आम्ही पन्नास दिल्याने ते आनंदात होते त्यांनी अगदी नोटा नाचवून दाखविल्या. ( आजच्या काळात पन्नास रुपयात एवढा आनंद होऊ शकतो का हा प्रश्न पडेल काही जणांना पण वीस-बावीस वर्षांपूर्वी पन्नास रुपये खूप जास्त होते. ) झाले, ते दोघेजण पळत अनिलकडे गेले आणि म्हणू लागले, " साबजी देखो ना आपके साथवाले साबजीने पचास रुपये दिये हैं, आपभी दिजीये. हम खूश हो जायेंगे." काश्मिरी लोकांचे हिंदी आणि मुंबईचे हिंदी म्हणजे एकदम दोन टोके. त्यांना सतत मान द्यायची आणि दुसऱ्याकडून घ्यायची सवय. आणि इकडे मुंबईत आम्ही टिपीकल बंबईया हिंदीवाले, पटकन अरेतुरे वर येणारे.

अनिल म्हणाला, प्रथमच ठरले होते बक्षिसी देताना जबरदस्ती नाही करायची. जे खुशीने देऊ ते घ्यायचे. त्याने पन्नास दिले म्हणजे मी पण द्यायला पाहिजे हे तू कोण सांगणार. मला वीसच द्यायचेत ते मी दिलेत तेव्हा तुम्ही जा आता. बाचाबाची सुरू झाली. स्लेजवाले हटून बसले आणि अनिलही ऐकेना. नवरा मध्ये पडून म्हणाला की कशाला वादावादी करतोस देऊन टाक नाहीतर मी देतो. तर अनिलला तेही पटेना. अनिल एकदम अरेतुरे करून जोराजोरत बोलत होता.

अभिषेकच्या बुटात बर्फाचा मोठा गोळा बराच वेळ राहिल्याने त्याच्या टाचेची संवेदनाच गेली होती. मी आणि शुभा हाताने टाच घासून उब आणण्याचा प्रयत्न करीत होतो. पाहतापाहता तिथे बसलेले सगळे स्लेजवाले अनिल व नवऱ्याभोवती गोळा झाले. माझ्या मनाने लागलीच अशुभ संकेत द्यायला सुरवात केली. शुभाला म्हटले, " अग, आपण दुसऱ्याच्या गावात आहोत, त्यात इथे एकही माणूस दिसत नाहीये ह्यांच्याशिवाय. काहीतरी विपरीत घडले तर फार मोठी भानगड होऊन बसेल. तू तरी सांगून बघ." तिने नुसतेच हात झटकले व म्हणाली, " काहीही उपयोग होणार नाही. तो माझे ऐकणार नाही उलट आणिकच चिडेल. तू शांत राहा. मला ह्याची सवय आहे. " तिला असली तरी मला नव्हती त्यामुळे मी नवऱ्याकडे धाव घेतली.

तोच अनिलने त्याच्याही नकळत दररोजच्या सवयीने शिवी दिली. गुजरातीत वेडा अश्या अर्थाची. ते ऐकले मात्र, सगळे स्लेजवाले हातातल्या स्लेज घेऊन मारण्याच्या तयारीत अंगावर येऊ लागले. त्यांच्यात एक जण थोडा वयस्कर होता त्याने तरुण पोरांना कसेबसे थोपवत माझ्या नवऱ्याला म्हटले, " साबजी, आपके मित्रको समझाईये. ये काश्मीर हैं, बंबई नही. पैसा नही मिले कोई बात नही मगर ये गालीगलोच नही किजीयेगा. यहा ये सब नही चलेगा, देख रहे हो ना? ये बच्चे आप सबको काटकर उपर फेंक देंगे किसी को कुछ पता नही चलेगा. बालबच्चे औरते साथ लेकर ऐसे तमाशा नही करते. समझाईये उन्हे."

दोन क्षणात इतकी भयंकर स्थिती ओढवली होती की आम्ही सगळे थरथर कापू लागलो. अनिलला गप्प बस एकदम असे म्हणत नवऱ्याने स्लेजवाल्यांना पैसे देऊन, " भैय्या माफ करना, हमलोगोंकी हिंदी ऐसीही हैं. इसमे आप लोगोंका अनादर करने का हमारा कोई इरादा नही था " असे सांगत क्षमा मागितली. तेव्हा कुठे ते सगळे पांगले. दोन्ही पोरांना कडेवर घेऊन पळतच बसस्टँड गाठला. ह्या सगळ्या रामायणातही अभिषेकच्या टाचेवर त्यातल्याच एका स्लेजवाल्याने दिलेली रम टाकून चोळल्याने त्याच्या पायात जान आली होती. बसमध्ये बसलो आणि पोचलो एकदाचे हॉटेलवर तेव्हा कुठे जीवातजीव आला.

माझा नवरा नेहमी म्हणतो, परक्या ठिकाणी जाऊन माणसाने नेहमी तारतम्य आणि सामंजस्य ठेवून वागावे. उगाच छोट्याछोट्या गोष्टींमध्ये अडेलतट्टूपणा करू नये. त्या स्लेजवाल्यांचे थोडे चुकलेच होते परंतु कधी कधी प्रसंग पाहून चूक का बरोबर ह्या तात्त्विक वादात न पडता पटकन ताण मोकळा करून टाकावा. त्यात लहान मुले व बायको बरोबर आणि घरापासून इतके दूर. नेव्हर. फक्त तीस रूपयांसाठी जीव गमवायची वेळ आली होती.

4 comments:

  1. अजून एक जबरदस्त स्टोरी .. :) अश्याचं लिहित रहा ... :)

    मी पोचलो काल सुखरूप मुंबईला .. :)

    ReplyDelete
  2. hi

    i visited first time on your blog .

    This is really one of the great work , i came across. I really liked this post ...so many thoughts came to my mind . I liked your blog as well. nicely made.

    mala jaast marathi nahi yete , par mala samajhto ,as I am from Nagpur.

    thanks . Please visit my poem blog to read new poems : www.poemsofvijay.blogspot.com

    regards

    vijay

    ReplyDelete
  3. रोहन,धन्यवाद. अरे मी विचारच करत होते की पोचलास ना नीट. आता आंब्यावर ताव मार आमची आठवण काढून. :)

    विजय कुमारजी,आभार. आपल्या कौतुकाने खूप छान वाटले. Keep visiting. Once again Thanks a lot.

    ReplyDelete
  4. छान आहे आठवण । एकदम २५ वर्षां पूर्वी आम्ही काश्मीर ला गेले होतो त्याची आठवण झाली .

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !