जाता जाता एक नजर इथेही........

Tuesday, March 31, 2009

लिखे जो खत तुझे ....

आज सकाळी सकाळी शशीकपूर-आशा पारेख- "कन्यादान " मधील हे मधुर गाणे एकले,

लिखे जो खत तुझे, वो तेरी याद मे
हजारो रंग के, नजारे बन गयें
सवेरा जब हुआं, तो फूल बन गयें
जो रात आयी तो, सितारे बन गयें

अप्रतिम कल्पना. शब्द साधे सहज तरीही भाव हृदयाला हात घालणारे. मन प्रफुल्लित होऊन गेले. नीरज यांचे सुंदर शब्द व रफीचा मनात उतरत जाणारा स्वर.शंकर-जयकिशनचे संगीत. यांचा मिलाप म्हणजे हे मधुर गाणे. तल्लीन होऊन ऐकत राहावे. ह्या झिरपत जाणाऱ्या स्वरांची जादू काळाच्या ओघात हरवलेल्या अन व्यवहाराच्या धबडक्यात आतल्या मनात कुठेतरी खोलवर गाडलेल्या अलवार प्रेमाची याद देईल. तितक्याच हळुवारपणे त्याला मनसोक्त पसरू द्या. पुन्हा एकदा त्या प्रेममय आठवणीचा उत्सव मनभर साजरा होईल. जपलेले क्षण कुरवाळून पुन्हा कुलूपबंद करून ठेवा कारण ही अशीच सुंदर सकाळ अन अशी अप्रतिम गाणी जेव्हांजेव्हा कानावर पडतील तेव्हातेव्हा ही आठवणीची जपमाळ ओढायलाच हवी, खरे ना?

Monday, March 30, 2009

रुमाल

बालपणापासूनच " रुमालाशी " आपल्या सगळ्यांची ओळख होते. आपल्याकडे बहुतेक सगळेच दररोज रुमाल वापरतात. लहान मूल बालवाडीची पायरी चढते तेव्हा प्रथम ह्याची ओळख होते. त्याआधीही त्याने हा वापरलेला असतो फक्त वेगवेगळ्या स्वरूपात, लाळेरे, दुपटे, इत्यादी. बालवाडीत जाताना त्याच्या शर्टाला/तिच्या फ्रॉकला हा टाचला जातो. सांगितले जाते की, नाक गळाले तर ह्याने पूस, जेवण झाले की तोंड ह्याला पूस. मुलींचे छान छान नाजूक , मुलांचे साधे पण टिकवू रुमाल. अनेकदा लक्षात येते की, आया आठवणीने रुमाल देतात पण तो धुता. त्याची खळही काढत नाहीत. बिचारी पोरे.

मोठे होता होता रुमालाचे महत्त्व समजू लागते. शाळेत खेळता खेळता पडले की गुडघ्याला, कोपरांना झालेल्या जखमांना बांधायला. बाई मुलांना ओरडल्या की हाच रुमाल तोंडाला लावून मुली फिदीफिदी हसतात, तर कधी प्रिय मैत्रिणीने कट्टी घेतली की डोळे पुसतात. अनुरोध मधले राजेश खन्नाचे," किस कदर एक हसीन खयाल मिला हैं, राह मैं एक रेशमी रुमाल मिला हैं..." किंवा " मेरी जोहराजबी गाताना बलराज सहानीच्या हातातील; यारी है इमान मेरा-म्हणताना प्राणच्या मनगटात; अनेक गाजलेल्या कवाल्या मध्ये झालेला ह्याचा प्रभावी वापर." अनुरोधसारखे सिनेमे पाहून तरुणाई अंगात संचारताना मुली रस्त्यातून जाताना दिसल्या की रुमाल टाकून एकदम फिल्मी स्टाइल मध्ये लाइन मारणारे रोमियो... कदाचित आजकाल हा उपयोग होत नसावा. मुलींनी रुमाल," अरे हो, खरेच की." असे म्हणत घ्यायला सुरवात केल्यावर सारखा नवीन रुमालांचा खर्च परवडेनासा झाला बहुदा. एकदा असेच एका मित्राच्या घरी गेले असता एक छान खोका दिसला. उघडून पाहिले तर अनेक नाजूक रुमाल होते. त्याला विचारले तर म्हणाला, " माझ्या धारातीर्थी पडलेल्या प्रेमाच्या(एकतर्फी) खुणा आहेत गं. लग्न झाले की प्रत्येकाची कथा बायकोचे मनोरंजन करेल म्हणून जपून ठेवलेत." त्याचा खिलाडूपणा आवडला, देव करो आणि बायकोही तशीच मिळो. म्हणजे हे सारे रुमाल पावन होतील. भडक रंगाचे चटेरीपटेरी रुमाल गळ्याभोवती गुंडाळून पानाच्या ठेल्यावर उभे राहून भंकस करणारे सडकछाप अजूनही कधीमधी दिसतात.

प्रेमात पडताना आणि पडल्यावर जागोजागी उपयोगी पडणारा हा रुमाल. पाऊस आला की प्रियेच्या डोक्यावर विराजमान होणारा, केसावरून, गालावरून चमचमणारे पावसाचे थेंब अलगद टिपणारा. समुद्रावर, बागेत प्रियेचे कपडे खराब होऊ नये म्हणून आवडीने माती माखून घेणारा. लाडीकपणे दातात धरलेला तिचा नाजूक रुमाल अन त्या रुमालात जाऊन बसलेले प्रियकराचे मन. अचानक तिचा भाऊ समोरून येताना दिसलाच तर तोंड लपविता येणारा. क्षितिजावर लुप्त होत असलेल्या सूर्यबिंबाबरोबर, आत निघायलाच हवे ह्या जाणीवेने विरहाची आर्तता तिच्या डोळ्यातून झिरपायला लागली की हळूवारपणे खात्री पटवणारा, मी तुझाच, तुझ्यासाठीच आहे. आजची तरूणाईही ह्याचा आणिक नावीन्याने उपयोग करीत असावी.

पाहता पाहता हा रुमाल, हवाच ह्या नित्य गरजांमध्ये जाऊन बसतो. एखादे दिवस जर त्याला विसरले तर दिवसभर प्रचंड बैचेनी येते. त्यादिवशी त्याचे महत्त्व आणि अपरिहार्यताही लक्षात येते. मुंबईसारख्या दमट हवेत वाहणाऱ्या घामाच्या धारा शोषणारा नितांत आवश्यक रुमाल. कुटुंबासाठी उन्हात वणवणताना येणारा घाम पुसणारा तर कधी वैफल्याचे, पराभवाचे, अगतिकतेचे अश्रू शोषणारा. नको असलेली व्यक्ती समोर उभी ठाकल्यास वैतागाची भावना चेहऱ्यावरून पुसून काढणारा. मुलाखतीस जाताना, महत्त्वाच्या मीटिंगमध्ये अस्वस्थता टिपून आंदोलने संयत करणारा. दुनियेत वावरताना काहीतरी आठवून अनावर होणारे हसू दाबताना तर कधी आईच्या डोळ्यातील आनंद टिपताना. माणसाच्या भावनिक आंदोलनाचा एकमेव साक्षीदार. अनेक जण एकच रुमाल आठवडाभर आलटूनपालटून घड्या उलगडत वापरतात. आठवड्याच्या शेवटी जेव्हा रुमाल धुण्याच्या बादलीत जाऊन पडतो त्यावेळी ह्या सात दिवसांचे सात मलिन छप्पे दिसतात. प्रत्येक छप्पा स्वतःची कहाणी सांगत असतो.

आपले मनही अशाच अनेकविध कप्प्यानमध्ये वाटले गेले आहे. चांगले-वाईट भाव सतत त्यात उमलत असतात. आसक्ती, ओढ, वासना, गरज, स्वार्थ, दु:,विषाद, आनंद, माया, प्रेम, आशा, प्रगती, भक्ती, तटस्थता...विरक्ती अशा कित्येक घड्या आपण घातल्यात. रुमालासारखे आपले मनही अनेक गोष्टी शोषून घेत असते, त्याचवेळी कुरकुरता एखाद्या सोशिक बाईसारखे( पुरुषही सोशीक असतात ह्याबद्दल माझ्या मनात दुमत नाही, केवळ कानालासवयीचे झालेय म्हणून वापरले आहे) प्रसन्न चेहरा मांडत राहते.

इथे-अमेरिकेत मी रुमाल वापरीत नाही. कागदाची(टिशू) दुनिया आहे ही. काही विसविशीत तर काही घट्ट. ह्या कागदांना ओलावा, समजूतदारपणा नाही. आहे तो व्यावहारीक तटस्थ कोरडेपणा, मनाचा एकही थेंब बाहेर सांडू देणारा अलिप्तपणा. वापरला की कचऱ्याच्या टोपलीत पडणारा , भावनारहित खरखरीत कागद. मायदेशात आले की लगेच रुमाल माझ्या हातात विसावतो कारण कोंडलेले आभाळ मोकळे होताना बरसणारही आहे हे त्याला सांगताही कळलेले असते.

Saturday, March 28, 2009

कॅच मी इफ यू कॅन...

गेली दोन वर्षे आम्ही डिसेंबर महिन्यातील शेवटच्या पंधरवड्यात आठ ते दहा दिवस फ्लोरिडा आणि तिथून क्रूज घेऊन उबदार वातावरणाचा आनंद गोळा करायला जात आहोत. डिसेंबर महिन्यात जाण्याची दोन कारणे. एक म्हणजे ह्या मिशिनगच्या अतिथंड, साचलेल्या बर्फाच्या ढिगांपासून काही काळ सुटका आणि दुसरे पोराची सुट्टी. गेल्या वर्षीची क्रूजची मजा आठवून आणि चार दिवस कमी पडले म्हणून ह्यावेळी सात दिवसांच्या सफरीवर जाण्याचे एकमताने ठरले. प्रत्येक दिवस एका आयलंड ची सफर हवी असे माझे मत होते. आता एवढे पैसे खर्च करायचे तर किमान बरेच काही बघायला हवेच. नवरा आणि मुलगा ह्याच्या एकदम विरुद्ध. मुलाचे म्हणणे म्हणजे सगळे दिवस लवकर उठायचे. दिवसभर खूप वणवण करायची कारण परत कुठे येणार आहोत इथे. म्हणजे मजा राहिली बाजूला सात दिवसांची सजा होणार. मी नाही येणार. नवऱ्यानेही री ओढली. मलाही मनातून त्यांचे म्हणणे पटलेले होतेच. मग मीही ताणून धरले नाही.

बरेच पर्याय पाहिल्यावर, सात दिवसांची ' कॅरेबियन आयलंडस ' ची क्रूज आम्ही बुक केली. शनिवारी सुरू होऊन पुढच्या शनिवारी संपणार होती. पहिले दोन दिवस बोटीवरच धमाल, आराम, शोज आणि मस्त खाणे-पिणे, मधले तीन दिवस तीन आयलंडस, शेवटचे दोन दिवस पुन्हा धमाल, आराम. नवरा-मुलगा खूश होते. आता आम्ही सगळे आतुरतेने ट्रीपच्या दिवसाची वाट पाहू लागलो.

मुलगा त्याच्या कॉलेजच्या गावाहून निघायच्या आदल्या दिवशी घरी येऊन पोचणार होता. दुसऱ्या दिवशीची पहाटे सहाची फ्लाईट आम्ही घेतली होती. क्रूज दुपारी चारला सुटणार होती. डेट्रॉईट ते फ्लोरिडा सारा तीन तासांचा प्रवास. गेल्या वेळेचा अनुभव गाठीशी असल्याने सगळे नीट होणार अशी खात्री आम्ही बाळगून होतो. बुधवारी रात्री पासून बर्फ पडायला सुरवात झाली. पाहता पाहता वादळ सुरू झाले. गुरवारी सकाळ पर्यंत दोन फुटापेक्षा जास्त बर्फ पडला. संपूर्ण दिवसभरातील सगळ्या फ्लाईट रद्द झाल्या. आता वादळ थांबेल मग थांबेल अशी आशा आणि प्रार्थना आम्ही करीत राहिलो. शेवटी त्याचे मन भरले तेव्हाच ते थांबले. दुसऱ्या दिवशी आश्चर्य म्हणजे मुलाची फ्लाईट वेळेवर निघाली आणि वेळेवर डेट्रॉईट ला पोचली. आम्हाला थोडा हुरूप आला. चला आज बर्फाचे भविष्यही नव्हते म्हणजे उद्या आमचे विमान नक्की वेळेवर निघणार. सगळी तयारी झाली. मध्यरात्री अडिचला आम्ही घर सोडले.

घरापासून विमानतळ, तासाचे अंतर. बर्फामुळे गाडी खूपच सांभाळून आणि हळू चालवावी लागते म्हणून आम्ही लवकरच निघालो होतो. दहा मिनिटांत बर्फ पडू लागला. पाहता पाहता मोठे मोठे तुकडे पडायला लागले. आम्ही वेळेवर पोचलो, आठ दिवस गाडी पार्किंग लॉट मध्ये ठेवायची होती, ते सोपस्कार पार पाडून शटल घेऊन विमानतळावर पोचलो. चेकिंग झाले, विमान वेळेवर सुटणार होते. आम्ही आता ट्रीपच्या मूडमध्ये येऊ लागलो. बोर्डिंग झाले. आमची ही फ्लाईट आम्हाला अटलांटाला घेऊन जाणार होती. तिथून मायामीची कनेक्टिंग फ्लाईट घेऊन आम्ही साडेअकराला मायामीला पोचणार. अटलांटा व मायामी चे व्हेदर् एकदम छान होते. त्यामुळे एकदा का डेट्रॉईट मधून आम्ही वेळेवर निघालो की जिंकलो.

विमान हळूहळू निघाले. रनवेवर लागण्या आधी इतक्या प्रचंड बर्फवृष्टीत प्रत्येक विमानाचे उड्डाण होण्या आधी डिआईसींग( पंखावरील, गतिरोधक झडपांवरील व रडारवरील बर्फ पूर्णपणे काढून टाकणे ) करणे अत्यंत गरजेचे व अपरिहार्य असते. अन्यथा मोठा अपघात होण्याची शक्यता असते. विमान हळूहळू निघाले आणि डीआईसींगच्या लाइन मध्ये जाऊन थांबले. सहा वाजले होते. साधारण वीस मिनिटे लागतात हा सोपस्कार पूर्ण होण्यासाठी. म्हणजे अगदी साडेसहाला जरी आम्ही उड्डाण केले तरी आठपर्यंत अटलांटा. पुढची फ्लाईट आठपंचेचाळीसची होती. आदल्या दिवशी त्यांनी ती वीस मिनिटे उशीरा सोडली होती कारण डेट्रॉईट ची फ्लाईट लेट होती. म्हणजे सगळे काही अजूनही आव्याकयात होते.

सहाचाळीस झाले अजूनही आमच्या प्लाईटचे डिआईसींग सुरूही झाले नव्हते. मुलाने विचारले, " आई आपली पुढची फ्लाईट कितीची आहे? " मी आठ-पंचेचाळीस असे सांगितल्यावर एकदा बाहेर पाहिले एकदा घड्याळ आणि तो गाढ झोपला. पोराने एकदम प्रॅक्टिकल ऍप्रोच घेतलेला. नवऱ्याचे ब्लडप्रेशर वाढलेलेच होते. त्यात आता काहीही झाले तरी क्रूज गाठायचीच हे त्याने ठरविलेले. म्हणजे आता कितीचा फटका बसणार हा विचार करण्यात मी दंग झाले. शेवटी एकदाचे सात वाजून दहा मिनिटांनी विमान निघाले.

अटलांटाला पोचलो तोवर कनेक्टिंग फ्लाईट जी काल त्यांनी थांबविली होती ती आज वेळेवर गेलेली होती. आम्ही पळत मदत कक्षात गेलो. सुदैवाने तिथली बाई अतिशय चांगली होती. हसून तिने स्वागत केले, सगळे कथन ऐकून तिने आम्हाला धीर दिला. तुमची वेकेशन नक्की होणार आणि तुम्हाला खूप मजा येणार आहे, ही खात्री बाळगा. मी पाहते लवकरात लवकर तुम्ही मायामीला कसे पोचाल. शोधाशोध करून साडेअकराच्या फोर्ट लॉउडरडेलच्या फ्लाईटचे तिकिट दिले आणि शुभेच्छाही दिल्या. आम्ही आता थोडेसे शांत झालो. दोन तास होते म्हणून थोडे अटलांटा एअरपोर्टवर भटकलो. मनात थोडी धाकधूक होतीच.

साडेअकराचे विमान होते म्हणून अकराच्या आसपास गेटवर आलो. पाहिले तर दहा मिनिटांचा डिले दाखवत होते. अकरावीस झाले पण आमचे विमान अजूनही लागले नव्हते. हळूहळू आमचा धीर सुटायला सुरवात झाली. आता पंचवीस मिनिटांचा डिले दिसत होता. आणि आमचे विमान लागले, हुश्श..... बोर्डिंग झाले. इथे डिआईसींग करायचे नसल्याने विमान रनवेला लागले आणि उडालेही. आमचा टांगलेला जीव जरा विसावला. पावणेदोनला आम्ही फोर्ट लॉउडरडेल ला पोहोचलो. एकच बॅग चेकईन केली होती तिही पटकन आली. तिथून पोर्टला जायचे होते जिथे क्रूज आमची वाट पाहत होती. विमानतळावरून बाहेर येऊन टॅक्सीची चौकशी केली असता कळले की पोर्टवर जायला साधारण चाळीस मिनिटे लागतात. पण नेहमीच ट्रॅफिक असतो, तेव्हा आज किती वेळ लागेल कोण जाणे. हंम्म्म्म...... म्हणजे अजूनही नकटी काही संपली नव्हती. आता घास अगदी तोंडाशी आला होता.

टॅक्सी निघाली। चला इथवर पोचलोय म्हणजे आपल्याला नक्की क्रूज मिळणार असे आम्ही एकमेकांना सांगत होतो त्याचवेळी मनात मात्र साशंकता भरून राहिली होती। आश्चर्य म्हणजे नेहमीच असणारा ट्रॅफिक आज नव्हता. अखेरीस त्याला तरी आमची दया आली होती. तीन वाजता आम्ही क्रूज च्या दरवाज्यात पोचलो. सामान उतरवले, टॅक्सीवाल्याचे पैसे देऊन, आभार मानून क्रूजवर बोर्ड करण्यासाठी आवश्यक सोपस्कारांच्या लाइन मध्ये जाऊन उभे
राहिलो. पुढचे सगळे पटापट झाले आणि आम्ही आमच्या केबीन मध्ये बॅग्ज टाकल्या. अडथळ्यांची शर्यत पार करून एकदाचे आम्ही कार्निवलच्या सर्वोच्च डेकवर समुद्राचा खारा वारा खात फुललेल्या चेहऱ्यांनी उभे एकमेकांना टाळ्या देत होतो. आता कोणीही आमचा आनंद हिरावून घेणार नव्हते.

Friday, March 27, 2009

घरकुल

सोसत नाही असे दुःख तू मला का द्यावे

माझाच सखा म्हणता कुणा कशाला पहावे

सांग मला हे दुःख पांघरून मी कसे उमलू

तमभरला मनाचा गाभारा तुजवीण कसा उजळू

बांधलेले उन्हातले घर माझे नको अरिष्टांनी विंधू

तुझ्या बाहूतली सावली माझी सांग कुठे शोधू

श्वासातूनी बहरती वेदनांची घन व्याकूळ राने

चांदण्या देहावरच्या विझतील का आसवाने

घेतली अवघी काया अधरांनी गोंदून

निघालास वाटाया पारिजात सवतीच्या अंगणातून

भय मनातले नाही संपत उरात पेटले आक्रंदन

तुज स्पर्शातले नाही चंदन माझे पदरा झाकले रुदन

होते मला हवे तुझेमाझे छोटेसे घरकूल

ज्याची जमीन मी आभाळ तू अन एक इवलेसे पाऊल

Thursday, March 26, 2009

होउन जाऊदे!!!

नवे वर्ष नवी सुरुवात
नव्या यशाची नवी रुजवात
आरंभ होई चैत्रमासीचा
गुढ्या तोरणे सण उत्सवाचा
कवळ मुखी घालू गोडाचा
साजरा दिन हो गुढीपाढव्याचा!
सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!
काल रात्री झोपताना वाटले, " उद्या नवीन वर्ष सुरू होणार. म्हणजे काय वेगळे होणार, सूर्य तर रोजच्याच वेळेला उगवणार. " खरंच की प्रत्यक्षात काहीही वेगळे होणार नाही. आपणही तेच, कामेही तिच, अडचणीही त्याच.

आज सकाळी उठल्यावर जाणवले, हे सारे असले तरी ॠतू कूस बदलून गेला. बर्फाने गारठून काड्या झालेल्या झाडांवर दिसतील न दिसतील असे कोवळे धुमारे डोकावू लागलेत. पक्ष्यांचे कूजन कानी पडू लागले आहे. दिवसाची लांबी वाढू लागलीय. मन प्रसन्न झाले.

आजकाल बरेच जण संकल्प करीत नाहीत. केलेले संकल्प पुरे होत नाहीत आणि मग खंत वाटत राहते. मला वाटते, ह्या खंतावण्या साठी तरी संकल्प करायला हवेत. त्याचे अनेक फायदे आहेत. संकल्प केला की किमान पंधरा दिवस तरी त्याच्या साठी प्रामाणिक प्रयत्न आपण करतो. ते सगळे दिवस आपण स्वतःवर खूश असतो. दुसऱ्याला संकल्प करण्यास प्रर्वूत्त करतो. (समाजकार्यही झाले बरोबरीने ) पुढे आपण जरी ढेपाळलो तरी मधून मधून पुन्हा प्रयत्न करतो. उदा. व्यायामाचा संकल्प, कितीतरी फायदे. पंधरा दिवसांनी आपलाच चेहरा आपल्याला तरतरीत दिसतो. उत्साह वाढल्याचे जाणवते. आठवड्यातला एक दिवस आपल्या आवडीचा पदार्थ मनसोक्त खाण्याचे सुख. प्रयत्न मनावर घेऊन केलेच तर आवडते ड्रेस घालण्याचा आणि ते होत आहेत ह्याचा आनंद. किमान काही रोगांना प्रवेश बंद ची पाटी दाखवता येईलच. ट्रीपला गेल्यावर हृदय आत्ता बाहेर येते की मग असे न होता, सगळ्यांबरोबर चालून मजा घेण्याचा आनंद. अजून बरेच आनंद. आता संकल्प न करून ह्या आनंदांना का बरं पारखे व्हायचे?

चला तर मग मंडळी नवीन वर्षाचे स्वागत आणि मनाशी यादीतील पहिला संकल्प. होऊन जाऊदे!!!

Wednesday, March 25, 2009

आदतसे मजबूर ...

राम मारुती रोड,ठाणा. समर्थ भांडारच्या समोरच्या दुकानाच्या लाइनमध्ये वूडलँड-चप्पल-बुटाचे दुकान होते, माझ्यामते अजूनही आहे. ही घटना दहा वर्षांपूर्वीची. मी सकाळी बाराच्या सुमारास दुकानात गेले होते. अजिबातगर्दी नव्हती. फक्त एकच बाई होती. दोन कर्मचारी आणि दुकानदार स्वत:. सगळे तिच्याभोवती घुटमळत होते. दहामिनिटे झाली तरी कुणीही मला येऊन काही विचारेना. मी थोडी गोंधळले, मनात म्हटले, " हम्म्म...मोठे गिऱ्हाईकदिसतेय. मग आमच्या सारख्याकडे कशाला लक्ष द्यायचे. जावे का निघून इथून." तेवढ्यात दुकानदाराचा आवाजकानी पडला. तो हळू आवाजात पण जरबेने बोलत होता. " तुम्हाला पुन्हा सांगतोय, पर्स मधील पट्टा काढून ठेवाआणि जा इथून." ती बाई जोरात ओरडत होती, " खोटा आरोप करू नका, मी काहीही घेतलेले नाही." मी अवाक. दुकानदाराने फोन उचलला आणि म्हणाला," थांब, आज बोलावतोच पोलिसांना." हे एकले मात्र तसे तिने पट्टाकाढून ठेवला आणि बडबडत तरातरा निघून गेली.


हे सारे डोळ्यांनी पाहूनही माझ्या मनाला खरे वाटत नव्हते. माझा हबकलेला चेहरा पाहून दुकानदार म्हणाला, " काय सांगायचे, ह्या अशा बायकांनी फार वैताग दिलाय. तिच्या नवऱ्याने हातापाया पडून सांगून ठेवलेय म्हणूनगप्प बसतोय. रोग आहे म्हणे हा. कसले काय हो. चांगल्या दोन द्यायच्या ठेवून काय जाईल पुन्हा चोरी करायला. चांगले पैशेवाले लोक आणि दळभद्री लक्षणे." हे असे प्रकार मी ऐकून होते पण पाहिले नव्हते. खरेच चांगलीसुखवस्तू दिसत होती. ह्यात कसला आनंद तिला मिळत असेल कोण जाणे. बरे तिचा नवरा, मुले तिला घरातकोंडूनही ठेवू शकत नाहीत आणि सतत बरोबर राहू शकत नाहीत. एखादे दिवशी कोणीतरी चोरी केली म्हणूनझोडपतील सुध्दा. कठीणच आहे.


काही दिवस गेले मी ती घटना विसरले नव्हते पण थोडी मागे पडली. ऑफिसमधून येतायेता समर्थ भांडारात गेले. तिथे फार आरडाओरडा ऐकू आला. गर्दी ही होतीच. थोडे पुढे जाऊन पाहिले तर कॅशियर ने एका बाईला धरले होतेआणि तो पर्स दे म्हणून ओरडत होता. नीट पाहिले तर तिच होती. बाप रे! काय हे, घेतला मोठा धोंडा स्वतःचडोक्यात घालून. तोवर तिचा नवराही येऊन पोचला. अक्षरशः: हातापाया पडून तिला घेऊन गेला. नंतर कॅशियरशीबोलताना समजले की हे असे तिने काहीतरी उचलणे अनेक वेळा झालेय. किती वेळा सोडून द्यायचे. आमचीहीनोकरी आहे ना? पकडले नाही म्हणून आमच्या पोटावर पाय यायचा. खरेच होते ना त्याचे.


हे असे लोक बरेच ठिकाणी दिसतात. चोरी कोणीही केली तरी वाईटच. गुन्हाच, मग त्याला शिक्षाही द्यायला हवी. पण ह्यांना कोण धडा शिकवणार? आणि ते शिकतील का त्यातून काही. हा रोग आहे मान्य, पण पहिली चोरीपाठीशी घातली गेली नसती तर कदाचित ही माणसे ह्याचा शिकार झाली नसती. अनेक जण पाहुणे म्हणून गेले कीहमखास काहीनं काही यजमानांच्या घरातले उचलतातच. पैसे तर काय तुझ्या खिशात आहेत तोवर तुझे माझ्याखिशात आले की माझे. आपल्याच माणसांवर आरोपही करता येत नाही. तोंड दाबून बुक्क्याचा मार. आणि हेच ह्यालोकांना बरोबर माहीत असते. पुन्हा कांगावा करण्यात पटाईत.


अशा लोकांना आणि समाजाला यापासून कसे बरे सोडवायचे?

Tuesday, March 24, 2009

तुमचीही कोणीतरी वाट पाहत आहे....


आजी गेली तेव्हा मी अमेरिकेत होते. १३ जानेवारी,२००१-भोगीचा दिवस. सकाळी मुलगा आणि नवरा आपापले डबेघेऊन गेले. घरातले आवरत एकीकडे मी मेल पहात होते. सासूबाईंचा मेल होता. दुःखद निधन. मी घाईघाईने मेलपाहिला, " अरे देवा!!" आजी गेली होती. बराच वेळ मला काहीच समजत नव्हते. रडूही येत नव्हते. हे खरे आहेह्यावर माझा विश्वास बसत नव्हता. आजही बसत नाही. मी आईला फोन लावला. आईने सांगितले की फारसा त्रास होता आजी गेली. तीन-चार तास हॉस्पिटल मध्ये होती. बोलतही होती. अटॅक आला होता. डॉक्टरांनाच सांगतहोती, मला काही कुठे दुखत नाही. लवकर घरी पाठवा. पुन्हा एक अटॅक आला आणि गेली.

आजोबा गेले त्यावेळी मी तशी लहानच होते.त्यांच्या अनंत आठवणी आहेतच. मलाठकीम्हणणारे कोणीराहिलेच नाही. आपल्या सगळ्यांना एकत्र आणणारी दोन माणसे, त्यातील एक निखळले ही जाणीव झाली. पणत्यावेळी आजी होती. आजीशी जास्त जवळीक म्हणूनही असेल कदाचित. आता आजीही गेली. आजीच्या आठवणीदाटून आल्या. आम्ही खूप लांब आहोत ह्याची जाणीव सतत त्रास देतेच. माणूस जवळ असला म्हणजे नेहमीचउपयोग होतो असे नसले तरी किमान तो जवळ असतो. आम्हाला तेही शक्य नाही. आजीचे कोणालाही काही करावेलागले नाही तिचे कुठलेच हाल झाले नाहीत. आपले माणूस गेले की दु: सगळ्यांनाच होते,कोणी ते दाखवतेकोणी मनात ठेवते.

वाटले आजी देवाकडे गेल्यावर सैरभैर झाली असेल. तोच तिला आजोबा भेटले असतील. त्यांनी," काय बबे, कशीआहेस गं?" असे विचारत जवळ घेतले असेल. मनाला थोडा आधार वाटला. आजी वर एकटी नाही, तिचे सगळ्यातप्रिय माणूस आहे आता तिच्याजवळ. माणसाचे मन कसे वेडे असते, दु:खातही सुख शोधते. माझा मुलगा लहानअसताना नेहमी विचारीत असे," माणसे का मरतात? मरण टाळणे शक्य आहे का?" तेव्हा मी त्याला सांगे," अरेकोणी देवाघरी गेलेच नाही तर या पृथ्वीवर उभे राहायलाही जागा उरणार नाही." हे सत्य आपल्या माणसाच्यामृत्यूने पचवावे लागले की असह्य असते. आणि मनात येते, का? का?

आठवणींची एकच गर्दी झाली. मला ताप भरला आहे आणि मी तिची आठवण काढते आहे हे कळताच ती लागलीचयेत असे. तांदुळाचे लाडू तेही फक्त तिच्या हातचेच मला अतिशय आवडतात म्हणून कोणीही मुंबईस जायलानिघाले की पेढेगाठी डबा भरून ती धाडून देई. आम्ही तिच्याकडे गेलो किंवा ती आमच्याकडे आली की दररोजरात्रीची गोष्ट कधी चुकली नाही. ती जवळ घेऊन पापे घेई त्यावेळी तिच्या तोंडाला गोडसर वास येत असे. आजहीमला तो जसाच्या तसा येतो. रावळगावला सुटीसाठी आम्ही जात असू, ते दोन महिने कधीच संपू नये असे वाटे. आम्हाला आवडते म्हणून कधी गव्हाचा चीक, तर कधी लसणाची चटणी आणि गरम भाकरी त्यावर मोठालोण्याचा गोळा .कधी पॉटमधले आइसक्रीम, बादलीभरून ऊसाचा रस. कोठीत पडलेली आंब्याची रास. दुपार-रात्रजेवणाची चंगळ.

सकाळी तुळशीला पाणी घालून फेऱ्या घालणारी आजी. संध्याकाळी देवाला दिवा लावून नमस्कार करणारी आजी. आजोबांची घरी येण्याची वेळ झाली की, कधी बैंगणी तर कधी अंजिरी, कधी लाल चौकडा तर कधी गर्द हिरवीनऊवारी साडी नेसून. केसांचा छानसा अंबाडा त्यावर बारीक जाळी, छोटेसे ड्बल मोगऱ्याचे दोन पाने असलेले फूलत्यावर खोवून. पावडर, कुंकू लावून, दोन्ही खांद्यावरून पदर घेऊन,उजवा पाय दुमडून ती पार्टिशनच्या मागे उभीराही. हे कधीही चुकल्याचे मला आठवत नाही. चहा झाला की व्हरांड्यात किंवा बागेत बसून गप्पा मारीत असे. कर्तबगार पुरषाची खरी अर्धांगींनी. आजी काहिशी तापटही होतीच. खूप काळ ती काही बोलत नसे पण डोके फिरलेकी मग वाटेल तसे बोले. सगळे जरा दबकूनच असत.

आजोबा गेले आणि आजीची रया गेली. तिची सोनसळी कांती करपल्या सारखी झाली. चारही मुले जवळ होती. पणसगळी आपापल्या व्यापात आणि कुटुंबात गुरफटलेली. सगळे आपलेच असले तरी फक्त आपलेच असणारे माणूसनाही याची तिला मनोमन जाणीव असावी. तिने स्वत:ला सांभाळले. चौऱ्यांशी वर्षांची झाली तरी खुटखुटीत राहिली. स्वतः:चे मन कशात कशात रमवत राहिली. सगळ्या मुलांकडे जाऊन ती राही, तिथून निघताना तिथला स्विचऑफ करी आणि दुसऱ्याकडे जाई. हे कसे तिला साधले होते कोण जाणे. तिच्याही नकळत ती निर्मोही झालीअसावी.

मागे जाऊन एकएक प्रसंग आठवले की कळते, संवाद होणे किती आवश्यक आहे. आमच्याकडे ती जेव्हां येई तेव्हाजसे आमचे उद्योग बदलत होते तसे तिचे प्रश्नही बदलते होते. मी कॉलेजमध्ये असताना माझ्या मित्र-मैत्रिणीबद्दलती विचारी, कधी जाते कधी येते ह्या वेळा हिला पाठ. मला वाटे कशाला हिला कळायला हवे हे. माझ्या मूड नुसार मीतिला ह्याची उत्तरे देई. पण स्वत:हून काही सांगत नसे.मी माझ्याच नादात दंग असे. आता वाटते, माझ्याशीबोलण्यासाठी माझ्या आवडीचे कारण ती शोधीत असे. जेणेकरून मी तिच्याशी जास्त वेळ गप्पा करेन. मीऑफिसला जाऊ लागले तशी, माझी कॉन्ट्रॅक्ट बस आज पाच मिनिटे उशीरा आली. किंवा अग, कावळा सारखाकावकाव करीत होता. मी म्हणे, " अग आजी, कावळा कावकाव नाही तर काय चिवचीव करेल." नातीशीबोलण्याची हि सारी निमित्ते होती. आमच्याकडे ती आनंदी असे पण तो आनंद अजून जास्ती वाढवणे माझ्याहातात असूनही त्यासाठी लागणारी क्रिया घडली नाही ह्याचे फार दु: होते. हेतुपुरत्सर दुसऱ्याला आनंद द्यायलाहवा हे कळत नव्हते.

ह्यातून आणिक एक सत्य समोर आले. नवरा-बायको किंवा आजच्या बदलत्या सहजीवनाच्या संकल्पनेनुसारआपला सहचर सदैव बरोबर हवा. ती एकच व्यक्ती अशी आहे की ज्याला नेहमीच आपल्यात स्वारस्य असते. आपण हवेसे असतो. आयुष्यभर आपली डोळ्यात प्राण आणून वाट पाहणारे आपले माणूस. दिवसाकाठी अनेकनिर्र्थक गोष्टी आपण बडबडत असतो. त्या गोष्टीही तितक्याच उत्सुकतेने ऐकणारे, त्यावर चर्चा करणारे, कधीमधीओरडणारे. संपूर्ण जगाचा राग ज्याच्यावर काढता येतो, तो तल्लीन होऊन पाहत असलेले दूरदर्शनचे चॅनल खटकनबदलून टाकले तरी तेही तितक्याच तन्मयतेने पाहणारे. रात्री उठून पाणी देणारे...... यादी भलीमोठी होईल, ती पूर्णकरणारे एकमेव माणूस.

आजीची खोली तिच्याशिवाय ओकीबोकी झाली. माणसाचे असणे आणि नसणे यात किती काय सामावलेले आहे. आपण सगळेच जाणता-अजाणता एकमेकांना दुखावत असतो. फक्त स्वत:चाच विचार करतो, आणि त्यासाठीकडवटपणे वागतो. माणूस गेला की जाणवते थोडे गोड बोलणे, आवर्जून विचारपूस करणे, प्रेम दर्शविणे हे सहजभाव किती महत्त्वाचे मनाची खात्री करून देणारे आहेत," आपलेही कोणीतरी आहे. आपणही आपल्या माणसांनाहवेसे आहोत." ही भावना संजीवनी बुटीचे काम करते. आणि ही संजीवनी आपल्या सगळ्यांच्या अंत:करणातठासून भरलेली आहे, देर आहे ती वाटण्याची.

आजी गेली, शेवटचा तंतूही तुटला. आता सगळ्यांना एकत्र बांधणारे कोणीच नाही. ह्या एवढ्या मोठ्या जगातआपली माणसे फारच थोडी आहेत, काही रक्ताची आणि काही आपण मैत्ररूपाने जोडलेली. माझ्यापरीने मी माझीमाणसे जीवापाड जपतेच आहे, तुम्हीही जपत असालच. अपेक्षा विरहित प्रेम, आतून उमटलेले हसू आणि दोन गोडबोल. बस आणिक कशाचीही आवश्यकता नाही. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष(जालावरील संवाद) नक्कीच जमेल. तुमचीहीकोणीतरी वाट पाहत आहे.....ह्याची अनुभूती करून देणारा आनंददायी संवाद!!!

Monday, March 23, 2009

गेले दोन दिवस...

अकराच्या दरम्यान नवऱ्याचा फोन आला। सकाळपासून मी ह्या फोनची वाट पाहत होते. देवाची प्रार्थना करीत होते. धडधडत्या हृदयाने मी फोन घेतला. नवऱ्याचा आनंदी स्वर कानावर पडला, " मिळाला. " कानावर विश्वास बसेना. मी पुन्हा एकदा खात्री करून घ्यावी म्हणून विचारले, " खरंच? सगळे काही आहे ना? लॅपटॉप? " तो म्हणाला, " हो, सगळे काही होते तसेच आहे. आता बरे वाटले ना? " मी थोडे बोलून फोन ठेवला.

स्प्रिंग ब्रेक साठी आमचा मुलगा आठ दिवस घरी आला होता. हे आठ दिवस इतके भर्रकन गेले की वाटतेय जणू तो आत्ताच आलाय. त्याच्या आवडीचे पदार्थ झाले, सिनेमे, थोडीफार भटकंतीही झाली. घर आठवडाभर चहकत होते. गडबड, गोंधळ, मस्त मजा येत होती. शनिवारची दुपारची दिडची फ्लाईट होती. सकाळी बॅग भरली. बॅकपॅक भरताना सहजच त्याला विचारले, " अरे ही पुस्तके आणि लॅपटॉप बॅगेत ठेवू का? " "काही नको गं, मला सवय आहे वजनाची. राहू दे तिथेच. " इति मुलगा. मी मान डोलवली खरी पण मनातून मात्र सारखे वाटत होते, कशाला एवढे वजन उचलायचे. विमानतळावर त्याला सोडले. फ्लाईट वेळेवर आहे आणि मी आता माझ्या गेटवर बसलोय. पोचलो की फोन करतो. असे त्याने सांगितले. आम्ही तोवर अर्ध्या वाटेवर पोचलो होतो. इथे चेटिनाड म्हणून एक छान साऊथ इंडियन हॉटेल आहे तिथे जेवून मॉल मध्ये जाऊया असे ठरले.

त्याप्रमाणे जेवून मॉल मध्ये पोचलो . नवरा गाडी पार्क करायला गेला. तेवढ्यात मुलाचा फोन आला. मी खूश, चला वेळेवर पोचलाही. मुलाने विचारले बाबा आहे का? त्याला फोन दे. माझ्या नेहमीच्या अनुभवानुसार त्याला काही त्रास झाला असेल तर तो आधी बाबाला शोधतो. बाबा गाडी पार्क करून येतोय, तो कशाला हवाय ते सांग ना मला. " मी प्रयत्न केला. "आई, अग मी ना माझी बॅकपॅक विमानतळावरच विसरलो आहे. असे कसे झाले काही समजत नाही गं. वेळ होता बोर्ड करायला म्हणून मी शेजारच्या सीटवर ठेवली होती आणि गडबडीत फक्त बॅग घेऊन गेलो. जेव्हां विमान रनवेवर गेले तेव्हा लक्षात आले. " त्याने एका दमात सारे सांगून टाकले. तेवढ्यात बाबाही आला. मग पुन्हा सगळे त्याला सांगितले. आम्ही दोघे उलट्या पावली परत विमानतळावर निघालो.

गाडीत संपूर्ण शांतता होती. मला समजत नव्हते की एवढी मोठी व दररोज गेली दहा वर्षे पाठीवर असलेली बॅकपॅक हा विसरला कसा. तरी मला सकाळी वाटत होते की पुस्तके, लॅपटॉप बॅगेत ठेवावे. ह्म्म्म.... मी कशाला त्याचे एकले. काहीतरी आगाऊ सूचना मिळते म्हणतात ना तसेच झाले होते, पण इतके कळले असते तर... ह्या दोघा बापलेकांना इलेक्ट्रॉनिक्सचे वेड आहेच. शिवाय जे घ्यायचे ते एकदम लेटेस्ट, मग किमंतीही तशाच असतात. आता केवढयाला पडणार हे रामायण? नवऱ्याच्या चेहऱ्यावर इतके संमिश्र भाव होते की मी काही बोलण्याच्या भानगडीत पडलेच नाही. रस्ताही मेला लवकर संपेना.

एकदाचे विमानतळावर पोचलो. नवरा गेला 'हरवले-सापडले' मध्ये शोधायला. थोड्यावेळाने तो रिकाम्या हाताने परत आलेला पाहून मी हताश झाले. गाडीत बसल्यावर त्याने एक नंबर लिहिलेला चिटोरा दिला आणि ह्या नंबरवर सोमवारी फोन करून विचारायचे. पाहू, नशिबात असेल तर मिळेल, असे म्हणाला. म्हणजे शनिवार आणि रविवार ह्या घालमेलीत जाणार, आम्हा तिघांचेही. फार त्रास झाला होताच त्यात आता सगळे लक्ष सोमवारकडे लागले. प्रत्येक वेळी किती पटकन संपला असे वाटणारा विकेंड ह्यावेळी संपता संपेना. मुलाने आजवर एकदा शाळेचा डबा हरवण्या व्यतिरिक्त काहीही हरवले नव्हते. आणि असेही त्याला ओरडूनही काहीही उपयोग नव्हताच. तोही खूप वैतागलेला होताच स्वत:वर.


शेवटी एकदाचा सोमवार उजाडला डबा भरला, सगळे आवरले. दिलेल्या नंबरवर फोन लावला पण लागेचना सारखा बिझी येत होत होता. शेवटी नवरा म्हणाला मी जातोच तिकडे. शनीवारी घरी आल्याआल्या त्यांच्या वेबसाइट वर जाऊन फॉर्म भरून सगळी माहिती दिलेली होतीच. त्यांचे पत्र घेऊन नवरा गेला आणि सगळी बॅकपॅक जशीच्यातशी मिळाली. सुटलो एकदाचे. मनात आले, आजकाल विमानतळावर कुणीही बॅग्जना हात लावायला घाबरतात हे फार चांगले आहे . पोलिसांनी बॅग उचलली होती त्यामुळे सहीसलामत मिळाली.

नशीब जोरावर होते हे नक्की. दोन दिवसांच्या घालमेलीची सांगता चांगली झाली. सुटलो. आता आमच्या गावाहून मुलाच्या कॉलेजच्या ठिकाणी बॅग पाठवायचा फेडेक्स चा खर्च किती येतो ते पाहायचे. हा... हा... हा...

Sunday, March 22, 2009

थरारक

गोव्याच्या प्रेमात मी लहानपणापासून पडले आहे. चौथीत असताना आम्ही गोव्याला राहिलोत. खूप छान आठवणीआहेत बालपणीच्या. लग्न ठरल्यावर मी नवऱ्याला सांगितले की आपण हनीमून साठी गोव्याला जाऊया. त्यालाहीगोव्याला जावेसे वाटत होते. त्यामुळे लग्नाआधीचा एक वाद टळला.

ठरल्याप्रमाणे आम्ही गोव्याला जायला निघालो. मुंबई-गोवा सारा पंचेचाळीस मिनिटांचा खेळ. आम्ही दोघेही खूशहोतो. विमानात आमच्या सीट्स कडे जाताना नवऱ्याने संदीप पाटीलला पाहिले.तो आणि त्याची बायको हीगोव्याला निघाले होते. माझा नवरा ठार क्रिकेट वेडा, आचरेकर सरांचा शिष्य. त्याने ज्या क्षणी संदीप पाटीललापाहिले तो मला विसरून गेला. माझ्या दुर्दैवाने त्याच्या शेजारची सीट रिकामी होती. नवरा त्याच्या शेजारी जाऊनबसला तो शेवटपर्यंत. मला त्याचे वेड माहीत होते त्यामुळे मी खिडकीतून बाहेर दिसणाऱ्या सौंदर्याचा आस्वादघेतला. असेही रागावून काही फायदा होणार नव्हता.

गोव्याच्या आमच्या वास्तव्यात बऱ्याच गमतीजमती झाल्या. पहिल्याच दिवशी संध्याकाळी आम्ही हॉटेलच्याचरे्स्टॉरंट मध्ये बसलो होतो. खूप गर्दी होती. थोड्यावेळाने एक जोडपे आले. आमच्यापेक्षा दहा-पंधरा वर्षाने मोठेहोते. एकदम हसमूख, खूप गप्पा झाल्या. गोव्याची बरीच माहिती कळली. वेळ कसा गेला कळलेच नाही. निरोपघ्यायची वेळ आली आणि बोलता बोलता त्याने खिशातून बंदूक काढून टेबलवर ठेवली. दोन मिनिटे आम्ही वासून पाहात राहिलो. नंतर नवऱ्याने विचारले, खरी आहे ना? आमच्या कोणाही मित्र-मैत्रिणिकडे ह्यापूर्वी आम्हीअसे कुठलेही हत्यार कधी पाहिले नव्हते. तो हसला, म्हणाला " अरे खरीच आहे, तू पाहा की हातात घेऊन." मलातर भितीच वाटली. नवऱ्याने हातात घेऊन पाहिली, नेम धरून पाहिला. मग त्यावरून थोडी गंमत झाली आणि तेदोघेही गेले.

आम्ही दोघेही आमच्या रूमवर गेलो. माझ्या डोळ्यासमोरून ती बंदूक जाईना. त्यात माझ्या नवऱ्याने ती हातातघेऊन पाहिली होती. म्हणजे जर उद्या त्या माणसाने कुणाला काही केले तर माझ्या नवऱ्याचे ठसे... अरे देवा! नवरागाढ झोपलेला, मी त्याला गदागदा हालवून उठवले. मला वाटत असलेली भिती त्याला सांगितली तर त्याने चक्कहात जोडले. म्हणाला," अग असे काही होणार नाही, मला झोपू दे. तू बस विचार करीत, केव्हातरी झोप लागेलच." आणि तो गेला झोपून माझी धडधड थांबेचना. गोव्याचे सगळे दिवस आणि नंतरचे वर्षभर माझ्या डोक्यात कुठेतरीहे चक्र चालूच राहिले. ती बंदूक स्वप्नात येई आणि पोलीस आम्हाला शोधायला आलेत.

साऊथ गोवा/नॉर्थ गोवा ह्या दोन्ही टूर्स झाल्या, खूप मजा येत होती. चौथ्या दिवशी बहुतेक मी बरेच खारे काजूखाल्ले त्यामुळे असेल किंवा काय कोण जाणे पण मला उलट्या होऊ लागल्या. रात्रीपर्यंत माझी परिस्थिती जराजास्तीच बिघडली. नवरा थोडा घाबरून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी डॉक्टरकडे गेलो. डॉक्टर एकदम छानहोते, वयस्कर होते. त्यांना असे बरेच पेशंट पाहायला मिळाले असतील. त्यांनी धीर दिला,औषध दिले आणि फक्तदहीभात खायची परवानगी दिली. माझे तोंड अगदीच उतरले, वाईट वाटत होतेच, अपराधी भावना जास्त. त्यातभिती काही पाठ सोडत नव्हती. नवऱ्याने छान समजूत घातली. अजिबात वैतागलो नाही असे बरेच वेळा सांगितले. मनाला थोडे बरे वाटले. शेवटचा दिवस मस्त गेला. मला खायचीही परवानगी मिळाली होती. तो दिवस आम्ही खूपउंडारलो. बोटीची राईड झाली. मग दुसऱ्या दिवशी पॅकिंग झाले. दुपारी चारची बस होती आमची. हॉटेल ला टाटाकरून आम्ही गोवा सोडले.

प्रवास बराच मोठा त्यातून बसचा. आमच्या पुढच्या सीट्वर एका बॅंकेतले दोघेजण होते. ते दोघेही ब्रिजटुर्नामेंटसाठी गोव्याला आले होते. आमच्या आणि त्यांच्या गप्पा झाल्या, थोडी ओळख झाली. बसमध्ये बसूनआम्ही थोडे कंटाळलो. रात्रीचे बारा वाजून गेले होते आणि आमची बस एका गावात जेवणासाठी थांबली. सगळेजणजेवायला उतरले. आम्हाला फारशी भूक नव्हती तरीही काहीतरी खाऊन घेऊया असा विचार करून हॉटेल मध्येगेलो. वेटरला पुलाव आणायला सांगितला. हॉटेल मध्ये खूप गर्दी होती. बऱ्याच वेळाने एकदाचा पुलाव आला. पणथंड. तसेच खायला सुरवात केली आणि पाहतो तो काय, पुलाव मध्ये एक मोठा खिळा होता. वेटरला बोलावूनदाखवले तर विचित्र हसत म्हणाला, " अहो नीट बघा खिळा नसेल मुळा असेल." आणि खिळा काढून फेकून दिला. आम्ही पुलाव खाताच उठलो. बील देताना मालकाला काय झाले ते सांगून पुलाव चे पैसे घेऊ नका असे सांगितले. तर त्याने उर्मटपणे ते काही चालणार नाही पाहिजे तर दुसरा पुलाव देतो पण पैसे द्यावेच लागतील. आम्हाला पुलावनकोच होता आणि आमचा बसवाला हाका मारीत होता म्हणून आम्ही बील देऊन निघालो. परक्या गावात इतक्यारात्री कुठे वाद घालत बसायचे असा विचार करून बस मध्ये बसलो.

थोड्यावेळाने खूप आरडाओरडा ऐकू येऊ लागला. खिडकीतून पाहिले तर हातात तलवारी, सुरे घेऊन काही माणसेसगळ्या बसेस मध्ये चढून कोणाला तरी शोधत होते. सगळेजण अतिशय घाबरून गेले होते. तेवढ्यात त्यातलेदोघेजण आमच्या बसमध्ये चढले. एक जण म्हणाला अरे तो ह्याच बसमधला होता, कुठे आहे शोधा त्याला. तेउतरून गेले आणि आमच्या पुढच्या सीटवर बसलेले दोघे पळतपळत येऊन सीटवर बसले. त्यांच्या मागोमागकंडक्टर आला. आणि ड्रायव्हर ने बस सोडली. ते दोघेही फार घाबरलेले होते. कुणालाच काही कळत नव्हते कायझाले आहे. आमच्या पुढच्या सीटवरील एकाच्या शर्टाच्या चिंध्या झालेल्या, त्याला बरेच लागलेही होते. थोड्यावेळाने त्याने सांगितले की आम्ही दोघे बील देऊन बाहेर पडलो आणि आमच्या मागे रांगेत ते उभे होते. त्यांनी सगळे काही एकले पाहिले होते-खिळा-मुळा प्रकार. त्यावरून त्यांची तिथे बोलाचाली झाली आणि हे सारेपुढचे रामायण घडले होते. बसमध्ये विचित्र सन्नाटा पसरला होता. सगळेजण मुंबईला पोहोचेपर्यंत घाबरलेलेचहोते.

आजही ती रात्र, त्या तलवारी घेतलेली माणसे आणि बॅंकेतले ते दोघे आठवतात. वाईट वेळ होती, देवाची कृपा काहीअघटित घडले नाही.

Saturday, March 21, 2009

प्रवास...

दुःखातून लेखनाची निर्मिती होत असते, का?
शब्द, त्यातून उमटणारा सूर, त्याची तीव्रता, उदास भाव हे सारं
फोलपणातूनच वजनदार रूप धारण करतं.
मनाचा एखादा हळवा तंतू, उग्र रूप धारण करीत सगळे मनच काबीज करतो.
सुख, सुखाचा आनंद, समाधान हे सगळे तात्कालिक.
ते कधी सुरू झालं आणि कधी विरलं, सारच दिवास्वप्न.
दुःखाच्या डोहासारखे सुख कधी साठेल का?
स्वतःच्या पाऊलखुणांचे आभास ठेवून जाणार मनावर पसरलेलं धुकं जणू.
सुख गवसल्याचा जीवनांत असा फारच कमी कालखंड सापडेल,
तरीही त्या वितळत्या, तरल जाणीवेत माणूस गुंतलेला...
पण...
तत्परतेने जीवनाचा पण त्याच्या सहस्र करांनी धपाटे ओढतो.
माणूस जन्माला येताना अगणित नाती घेऊन येतो,
रक्ताची नाती.
जीव जसा जगायला लागतो तसे हळूहळू तो मानसिक बंध बांधतो.
त्याला हवेहवेसे, जे कधीही तो नाकारू शकतो. मात्र जन्माची नाती चिवट, मूळ घेऊन आलेली.
हा माझा, तो तुझा, ही भावनाच विनाशी. सगळे काही अशाश्वत, तरीही माणूस हव्यासी.
हि निर्मिती सुंदर, पण परिणिती भयंकर.
जन्मास आला, तेव्हा जीव एकटाच झगडला, नंतर नावाच्या लेबलात अडकला.
त्यातून सुरू झाले एक सांसारिक जंजाळ. तो विसरला, मुळात आपण एकटेच.
नात्यांच्या मोहात अडकून सुरू झाला प्रवास...
अव्याहत आकांक्षांचा, उर फुटेस्तोवर धावायचा, जीवघेणा प्रवास.
किती आशा-आकांक्षा पूर्ततेत बदलल्या आणि कितींची भूत आपल्याच
मानगुटीवर वेताळासारखी बसली. आपण सारे विक्रमदित्य.
तारुण्य स्वप्न पाहते, सुखाचे मनोरे रचते, पण
मानसिक वार्धक्य तिशीच्या आसपास रेंगाळायला लागते, अंगात भिनत भिनत
शरिरी वार्धक्याची जाणीव करतं आणि मन खचतं.
विषण्ण मने, विकलांग तने, काळाच्या ओघात धावतच असतात, पुढे काय?
शाश्वताच्या सीमारेषेवर माणूस हरप्रकारे पोहोचण्याचा प्रयत्न करतो, अपयशी प्रयत्न,
कधी कधी...
अंतरताटव्यातून एखादे नाजूकसे फूल उमलते, तो त्याला जीवापाड जपू लागतो.
जणू तो स्वतःच एक हळवं रोपटे बनतो, त्या फुलाला लांबूनच पाहत तो जीव रमवतो.
आणि...
अकस्मात कुणीतरी धटिंगण त्याच्या रक्तवर्णी पाकळ्या चुरगळतो.
फूल आक्रंदन करते, त्याचे कोमल भावविश्व उध्वस्त झाले म्हणून आकांत करते, षंढ आकांत.
फूल धुळीस मिळते.
एक वेडा प्रवास संपला. अनावर ऊर्मी निमाल्या.
पुनःश्व एकटेपणा. घेरून टाकणारी शांतता. ज्वालामुखीतील शांतता.
अन, झपाटून टाकणारा सूड चेतायला लागतो, जे मिळत नाही ते ओरबाडायचे.
विचारांना विषारी धार चढते, मस्तकात रक्त उसळते.
नकळत द्वेषाची ठिणगी पडते. त्या मातीत मिसळून म्लान झालेल्या फुलाच्या भग्न अवशेषांना त्वेषाने चिरडते.
ते क्षीण, विकल फूल त्या धक्क्याने बरबाद होतं, अविश्वासाने करुण दृष्टिक्षेप टाकून कोमेजतं.
आणि...
सूडाचा प्रवास संपतो. विझतो, हताशपणे.
पुन्हा एकाकी, क्षीण दुबळ्या कुडीचा सुरू होतो उरला सुरला प्रवास आणि शेवटी विनाश.

Thursday, March 19, 2009

भाव-जीवन

भावना उनाड बेछूट धुंद
अंतरात विझते जीवन मंद

झालो आता ठार कोरडा
होतो पापणीतला आषाढ वेडा

शब्दात माझ्या सलाचे वजन
वेडा म्हणोनी हासती सृजन

शोधीत फिरतो शब्दांचा अर्थ
गदारोळ उठतो भावनांचा व्यर्थ

यातनांचा ओघ वाहतो चिरंतन
स्पंदनात जळतो अंधार सनातन

Wednesday, March 11, 2009

मुके भोग

कढ वेदनेचे प्याले मी जे तू दिलेले
घेतलेस तू सुख ते माझ्याच यातनांचे


सदैव केला मी प्रयास उजळायचा घर तुझे
अश्रूंनी माखले काजळ ते माझ्याच नयनांचे


दुर्दैव हे सोसते घाव ते माझ्या चुकांचे
ओठांत स्वर दबले ते माझ्याच हुंदक्यांचे


नाही मी अबला जशी तुला वाटते
चौकट ओलांडून गेले ते ठसे माझ्याच पावलांचे

कधी न कळले मला काय मी शोधीत होते
एवढेच खरे मुके भोग ते माझ्याच नशिबाचे

घर कौलारू.


Tuesday, March 10, 2009

Monday, March 9, 2009

अबोला

नको हा मुक्याचा प्रवास, ज्याचे नाव अबोला
नको हा जीवघेणा त्रास, ज्याचे नाव अबोला

नको हा शब्दांचा वनवास, ज्याचे नाव अबोला
नको हा अश्रूंचा निवास, ज्याचे नाव अबोला

नको हा साथी अंधाराचा, ज्याचे नाव अबोला
नको हा सारथी वेदनांचा, ज्याचे नाव अबोला

नको हा तेजाब मनातला, ज्याचे नाव अबोला
नको हा विषाद हृदयातला, ज्याचे नाव अबोला

नको हा दुरावा आपल्यातला, ज्याचे नाव अबोला
नको हा अबोला संवादातला, दे त्याचे बोल त्याला

Friday, March 6, 2009

जय हो!!

गेले काही दिवस हे विचार पाठ सोडत नाहीत. काहीतरी खटकते आहे म्हणूनच त्यांची मनातली वस्ती काही हटत नाही. ह्यावर अनेक जणांचे विचार, आवेश, त्रागा व तटस्थता वाचली. पण सल काही कमी झाला नाही.

त्यांतील पहिला विचार, 'सारेगमा लिटिल चॅंम्स ' चा निकाल. कार्तिकी चे मनापासून अभिनंदन! गुणी मुलगी आहे. चांगली गाते. आता एकंदर निकालाचा विचार केला तर मला व्यक्तिशः हा निकाल मनापासून पचनी पडला नाही. शेवटी मेगा फायनल मध्ये गेलेल्या पाचही मुलांच्या गुणवत्तेचा, त्यांनी त्यांच्या वयानुसार आणि कुवतीनुसार केलेल्या अभ्यासाचा निकष लावला तर प्रथमेश व आर्या हेच केव्हाही पुढे असतील. झी ने ह्या सगळ्यातून एक मध्य काढला. तो ही आलेले SMS जाहीर न करता. लोक काय करतील, थोडे दिवस ओरडतील आणि गप्प बसतील. पुन्हा पुढे झी दुसरी स्पर्धा जाहीर करेल तेव्हा नव्या हुरुपाने SMS करतील. हे सरळ गणित मांडून Safe Game खेळला. मुग्धा गोड आहे, तिने छान प्रगती केली हे खरेच पण ती मुळात नंबर एक च्या स्पर्धेत नव्हती.( मुग्धा मला आवडते तरीही ) तिच कथा रोहितचीहि. कार्तिकीचि गुणवत्ता थोडी जास्त. परंतु प्रथमेश व आर्या ह्यांच्यापेक्षा जास्त हे पचवणे कठीण आहे. त्या दोघांतील एकाला विजयी घोषित केले तर दुसऱ्यावर अन्याय होईल की काय ह्या भीतीने झी ने त्यांना चक्क डावलून टाकले. खरे तर चाळीस वर्षांवरील स्पर्धा घेतली त्यावेळी जसे दोन नंबर दिले, एक स्त्रीगटातून अन एक पुरुषगटातून तिच परंपरा आताही पुढे चालू ठेवायची. म्हणजे हा प्रश्नच उदभवला नसता. कोणावरही अन्याय झाला नसता आणि वेगळ्या बाजाच्या कार्तिकीचे जास्त कौतुक झाले असते. अजून एक जातीवाचक प्रवाहही होता, व्यक्तिशः मला त्यात तथ्य दिसत नाही. झीने आलेले SMS जाहीर केले असते तर इतका गदारोळ माजला नसता. पण असे झाले नाही. आणि प्रत्येकाच्या मनात ह्या निकालामुळे अस्वस्थता भरून राहिली.

दुसरा विचार, 'स्लमडॉग ' चा. ऑस्कर मिळाले, आनंद झाला. मला सिनेमा आवडला. चोहोबाजुने अनेक उलट-सुलट मतप्रवाह वाहत होते-आहेत. सिनेमा चांगलाच बनवला आहे ह्यावर बहुतेक सगळेजण सहमत होतील. नेमके ते मार्मिकपणे दाखवले आहे. ह्यातून गरिबी, झोपडपट्टी दाखवायचा उद्देश आहे असे कुठेही जाणवत नाही. स्मिता पाटील च्या 'चक्र' मध्ये ह्याही पेक्षा जास्त चित्रण आहे मग आजच हा आक्षेप का? आपल्या अनेक नामवंत सिनेमांमध्ये याही पेक्षा वाईट गोष्टी- राजकारणी, समाजसुधारकी, पोलीसी दाखवल्या आहेत. त्यांचे काय? का हा सिनेमा एका ब्रिटिश माणसाने काढला म्हणून हा आक्षेप. सिनेमात बोट ठेवण्यासारखा, जाणुनबुजून आपली प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला आहे असा एकतरी प्रसंग दिसतो का?

कादंबरी बदलून टाकली हा एक जोरदार मुद्दा दिसला, परंतु स्वतः लेखकाला ह्याबद्दल कुठलाही आक्षेप दिसत नाही. उलटपक्षी खूपच आनंद दिसून आला. कादंबरी आणि त्यावरून बनवली जाणारी पटकथा ह्या संपूर्णपणे दोन भिन्न गोष्टी आहेत. दोन्हीचे फायदे आणि तोटेही वेगळे आहेत. चित्रपटात वेळेचे बंधन असते आणि त्यात प्रभावीपणे जराही पकड ढिली न पडू देता वाहणारी पटकथा लागते. आणि हेच हा सिनेमा पाहताना जाणवते. अतिशय लहान लहान प्रसंगातून समर्थपणे जराही न रेंगाळता कथा पुढे सरकते. मूळ धागाच जर झोपडपट्टीत आहे तर ती दिसणार हे ओघानेच आले. जातीय दंगल हे जळजळीत सत्य आहे तर त्याची धग तशीच भिडणार. अनेक देवळांच्या बाहेर किंवा सार्वजनिक ठिकाणी जे घडते ते घडते आहेच. मुले पळवून भिकेला लावणे आणि मुलींना विकणे ह्या रोज घडणाऱ्या घटना आहेत. ह्या घटना अतिरंजित/बटबटीत करून मांडलेल्या कुठेही दिसत नाहीत. अनेक चांगले विचार इतक्या वाईट परिस्थितीतही माणसाचे मन कसे करत असते आणि त्यावर अंमल हि करते हे दिसते. जमाल मलिक लहानपणापासून ज्या खस्ता खात मोठा होत असतो त्यातून तो काय शिकतो आणि योग्य वेळ येताच त्याचा वापर अचूकपणे करतो हे नेमके मांडले आहे.समाजाच्या विविध थरातील, व्यवसायातील, जातीतील, वयाने लहान-मोठी माणसे, विवक्षित परिस्थितीत कशी वागतात, त्यांच्या मनाचे अनेकविध पैलू यशस्विरीत्या बघणाऱ्यापर्यंत पोहोचवले आहेत. आपल्याकडे निसर्ग सौंदर्याची कमी आहे का? नक्कीच नाही मग तरीही बाहेर जाऊन चित्रीकरण का करावे लागते? ह्या मागची मानसिकता प्रेक्षकांना आवडते म्हणून असेल तर मग आपण प्रेक्षक बाहेरच्या सौंदर्याला प्राधान्य देताना आपल्या देशातील निसर्गदत्त सौंदर्य डावलतोच आहोत. त्याचे काय? दाखवले नाही म्हणजे सत्य बदलते का?

ऑस्कर मिळणे म्हणजे सार्थक झाले असे नसून जे गुणवत्तेच्या निकषावर समर्थपणे पात्र ठरले ते अभिनंदनास पात्र आहेतच. रहमान, गुलजार, नावाजलेले आणि कोणालाही माहीत नसलेले किंबहुना आपल्यात हे सुप्त गुण आहेत हे त्यांना स्वतःलाही नुकतेच कळलेले बाल-मोठे कलाकार. ह्या यशामध्ये त्यांचा वाटा मोठा आहे ह्याची जाणीव ठेवून त्यांना ऑस्कर वारी घडवणारे, दिग्दर्शक आणि निर्माते ह्या साऱ्यांचेच कौतुक. जय हो! जय हो! जय हो!

Wednesday, March 4, 2009

माझ्याचसाठी...

वाटते मला सारखे तू आहेस माझ्यासाठी
आहे अडसर तुझाच उंबरठा माझ्यासाठी


शोधित राहीले मी तुला इथे तिथे
राहिलास तू कोषात तुझ्याचसाठी

नसेल हा दोष सारा तुझ्या स्वभावाचा
मीच नाही जिंकले तुला माझ्यासाठी

शब्द माझे पडलें थिटे जे बोलले तुझ्याशी
आक्रंदन हृदयाचे व्यर्थ ठरले अबोला टाळण्यासाठी

कितीही केलास प्रयास तू मला दुरावण्याचा
देऊनी टाकले मी मज तुला तुझ्यासाठी

आहे मी सर्वदूर पसरणारी अभिन्न आठवण
पाहिन वाट तुझ्या सादेची माझ्यासाठी

रहा तू सदैव मग्न उन्हातल्या वेदनांशी
जाणून घे की आहे मी सावली तुझ्यासाठी

कातरवेळी आठव तुझा रक्ताश्रू झरतो गालांवरी
आण त्या आसवांची, तुला तू देऊन टाक माझ्याचसाठी

Monday, March 2, 2009

खरपूस मसाला भेंडी.


























जिन्नस
३५/४० कोवळ्या व भरण्यास योग्य अशा भेंड्या.
तीन चमचे चण्याच्या डाळीचे पीठ.
दोन चमचे दाण्याचे कूट
मध्यम कांदा
दोन चमचे सुक्या खोबऱ्याचा कीस
एक चमचा बडीशेप
अर्धा चमचा गरम मसाला
दिड चमचा धणेजिरे पूड
एक चमचा लाल तिखट
एक चमचा हिंग
अर्धा चमचा हळद
चार लसूण पाकळ्या
दोन चमचे साखर
एका लिंबाचा रस
चवीपुरते मीठ
दहा चमचे तेल

मार्गदर्शन

भेंड्या स्वच्छ धुऊन पुसून मध्ये एकच उभी चीर पाडावी। कांदा, कोथिंबीर बारीक चिरावी. डाळीचे पीठ खमंग भाजून घ्यावे. खोबऱ्याचा कीस , बडीशेप भाजून घ्यावे. गरम मसाला व धणेजिरे पूड गरम करून घ्यावी. लसूण, भाजलेले खोबरे व बडीशेप मिक्सर मधून काढावे. एका भांड्यात हे सगळे जिन्नस आणि दाण्याचे कूट, लाल तिखट, साखर, चवीनुसार मीठ, एका लिंबाचा रस, हिंग व हळद घ्यावेत. हाताने कुस्करून चांगले एकत्र करावेत. कांद्याला मीठ-साखरे मुळे पाणी सुटते व एका लिंबाचा रस यामुळे मिश्रण चांगले मिळून येते. हे मिश्रण भेंड्यांमध्ये भरावे. मसाला उरल्यास वाटीत ठेवावा. शक्यतो पसरट फ्रायपॅन घ्यावा. त्यात चार चमचे तेल घालावे. हलक्या हाताने एकएक भेंडी तेलावर ठेवावी. सगळ्या ठेवून झाल्या की बाजूने तीन चमचे तेल सोडावे. मध्यम आंचेवर सात/आठ मिनिटे झाकून ठेवावे. नंतर झाकण काढून अलगद सगळ्या भेंड्या उलटवून पुन्हा तीन चमचे तेल सोडावे. झाकण ठेवू नये. गॅस मध्यमच ठेवावा. दहा मिनिटाने पाहावे जर अजून थोड्या खरपूस आवडत असल्यास पुन्हा पाच मिनिटे ठेवावे. भेंड्या काढून घेतल्यावर जर मसाला उरला असेल तर तो छान परतून घ्यावा व तो भेंड्यांवर भुरभुरावा.

टीपा

स्टार्टर साठी केल्यास सगळ्यांना खूप आवडते. तिखटाचे प्रमाण आवडीनुसार बदलावे. लहान मुलेही आनंदाने खातात.