जाता जाता एक नजर इथेही........

Monday, August 31, 2009

तू त्रिशंकू होऊ नकोस.....



जमीन सोडली आभाळाला गवसणी घालावी म्हणून
नाती दुरावली कर्तृत्वाला उभारी मिळावी म्हणून

नशिबावर हवाला ठेवून निघालो चाचपडत
मायबापाच्या डोळ्यातला अंधार वाढवत

रोजच चाले खेळ बेरीज-वजाबाकीचा
नेमकं काय मिळवले काय गमावलेचा

हातातल्या रेषांतच भरून तुझी साठवण
सुरकुतल्या चेहऱ्यातच गोठून पडली आठवण

ह्यावेळी निघताना मी धरला तुझा हात घट्ट
आश्वासक थोपटत टाकलास शांत कटाक्ष

वदलीस, अग मी सदैव आहेच तुझ्यापाशी
दुरावलीस देहे तरी तू असतेसच आमच्यापाशी

हळवे होऊन दाटलेल्या कंठाने म्हणालीस
आयुष्याच्या संध्याकाळी आहोत एकमेकास

सुखाने जा आता मागे वळून पाहू नकोस
आम्ही इथे नातू तिथे तू त्रिशंकू होऊ नकोस

पाऊले चालती पंढरीची वाट.....


पाऊले चालती पंढरीची वाट
सुखी संसाराची सोडुनिया गाठ

गांजुनिया भारी दुःख दारिद्र्याने
पडता रिकामे भाकरीचे ताट

आप्त‍इष्ट सारे सगेसोयरे ते
पाहुनिया सारे फिरविती पाठ

घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा
अशा दारिद्र्याचा व्हावा नायनाट

मन शांत होता पुन्हा लागे ओढ
तैसा आणि गोड संसाराचा थाट

( गीत: दत्ता पाटील, स्वर: प्रल्हाद शिंदे )

( धन्यवाद रोहिणी )

Friday, August 28, 2009

खुसखुस



मित्राकडे गेलो असताना त्याने खुसखुस खिलवले. मला तर ते खाऊन पाहण्याआधीच त्याचे नावच भारी आवडले. खाल्ल्यावर तर अजूनच छान वाटले. तुम्हालाही आवडेल बहुतेक.

जिन्नस
  • एक वाटी खुसखुस
  • एक वाटी गरम पाणी
  • एक मध्यम टोमॅटो बारीक चिरून
  • एक मध्यम कांदा बारीक चिरून
  • एक हिरवी मिरची बारीक चिरून, दोन चमचे कोथिंबीर बारीक चिरून
  • दोन चमचे लिंबाचा रस
  • दोन चमचे फोडणीकरिता तेल
  • मोहरी, हिंग. अर्धा चमचा चाट मसाला, एक चमचा लाल तिखट
  • दोन चिमूट साखर व चवीनुसार मीठ

मार्गदर्शन

एक वाटी गरम पाणी घेऊन ते खुसखुसवर ओतून चमच्याने ढवळून लागलीच झाकण ठेवावे. टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची व कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी. पाळीत तेल गरम करून नेहमीसारखी मोहरी व हिंगाची फोडणी करावी. हळद मात्र घालू नये. पंधरा मिनिटाने झाकण काढावे. खुसखुसचे दाणे चांगले फुगून आलेले दिसतील. आता त्यात साखर, मीठ व चिरलेला टोमॅटो, कांदा, मिरची व लिंबाचा रस घालून सगळे मिश्रण एकत्र करावे. त्यावर तयार केलेली फोडणी घालून पुन्हा सारखे करावे. थोडे तिखट हवे असल्यास वरून लाल मिरचीचे तिखट भुरभुरावे. वाढताना कोथिंबीर घालून वाढावे.

टीपा

खुसखुस ( Couscous ) हे गव्हाचे असल्याने प्रकृतिलाही चांगले व गव्हाची प्रक्रिया केलेली ( प्रोसेस्ड-सेमोलिना ) भरड असल्याने जवळजवळ शिजलेलेच असते. खुसखुस गॅसवर शिजवायचे नाही. कोशिंबीर या सदरात मोडत असले तरी याने पोट भरते. आवडत असल्यास यात अर्धी वाटी गोड मक्याचे दाणे, मटाराचे दाणे वाफवून घालावेत. झटपट होणारे चवदार सॅलड.

Thursday, August 27, 2009

मन कशात लागत नाही


आज दिवसभर ऊन दिसलेच नाही आणि पाऊसही फिरकला नाही. सगळ्या दिवसावर रेंगाळत राहिले उदास, साकळलेले मळभ. अन मग अपरिहार्यपणे मनाच्या डोहातली ती गाडलेली टिंबे पृष्ठावर अवतरत राहिली, उरी फुटत राहिली. शेवटी कसाबसा दिवस सरलाय अन करकरीत सांज उतरली. डोळ्यांच्या जाणीवा वारंवार धूसर होताना, आठवून आईचे बोल, " दिवेलागणीला रडू नये गं " पराकाष्ठेने मी कढ जिरवतेय. तशात ग्रेसांची ही कविताच का नेमकी समोर येतेय......


मन कशात लागत नाही,
अदमास कुणाचा घ्यावा ।
अज्ञात झऱ्यावर रात्री,
मज् ऐकू येतो पावा ॥

श्वासांचे घेउन बंधन,
जे ह्रुदय फुलांचे होई ।
शिशिरात कसे झाडांचे,
मग वैभव निघुन जाई ॥

सळसळते पिंपळ-पान,
वाऱ्यात भुताची गाणी ।
भिंतीवर नक्षत्रांचे,
आभाळ खचवीले कोणी ॥

मन बहर-गुणांचे लोभी,
समईवर पदर् कशाला ।
हे गीत तडकले जेथे,
तो एकच दगड उशाला ॥

चल जाऊ दूर् कुठेही,
हातात जरा दे हात ।
भर रस्त्यामध्ये माझा,
होणार कधीतरी घात ॥

मन कशात लागत नाही..।
मन कशात लागत नाही..॥

कवी: ग्रेस. संग्रह: चंद्रमाधवीचे प्रदेश. अलबम: सांजवेळा

Wednesday, August 26, 2009

लागण...




अहो नाही मी स्वाईन फ्लू किंवा इतर संसर्गजन्य रोगांविषयी नाही म्हणत आहे. हे तर शरिरी रोग आहेत. याच धरतीवर मनाचेही व्यवहार चालतात ना? हां तेच तेच हसणे, रडणे, कोमेजणे, स्थितप्रज्ञ होण्याचा आव आणणे, जाऊ दे बाई-मोठी लांबण लागेल. अगदी ताजेच उदाहरण घ्या.......गणपती आलेत. सगळ्या वातावरणालाही उल्हास, आनंद, भारलेपणाची लागण झाली आहे. स्वाईन फ्लूने बाप्पा येण्याआधी मानसिक दडपण सगळ्यांनाच आले होते व अजूनही ते आहेच. साहजिकच आहे, जिवाशीच गाठ म्हटल्यावर. पण जसजसा बाप्पाच्या आगमनाचा दिवस जवळ येऊ लागला तसतसा उत्साह जोर धरू लागला.

सजावटीचे दररोज वेगवेगळे बेत, नवीन नवीन कल्पना, मग बाजारात घेतलेली धाव. इको फ्रेंडली करूयात का? का मागच्या वर्षीच्या डेकोचेच शक्कल लढवून एकदम वेगळेच काही बनवावे, एक ना दोन शेवटी आई ओरडते. अरे काय ते एकदा ठरवा आणि लागा कामाला. तिलाही लागण झालेली असतेच. भराभर हात चालतो, रवा-नारळाचे लाडू, चिवडा, खिरापत, मोदकाचे सारण, दररोज जिकडे तिकडे गोडगोड खाऊन सगळे कंटाळतील म्हणून मग मधूनमधून काहीतरी तिखटमाखट बेत- झणझणीत पावभाजी/ वडा सांबार/मिसळ व दहीभात, अहाहा..ss.. मातोश्री झिंदाबाद. हा सगळा बाप्पाच्या आगमनाचा परिणाम.

एकीकडे ही खाण्याची तयारी तर दुसरीकडे गौराई येणार, तिच्या साड्या, दागिने, फुले-गजरे. कपाटात ठेवलेली सासूबाईंची गर्भरेशमी अंजिरी रंगावर सोनेरी बुट्ट्यांची नऊवारी साडी आई नेसते, अंबाडा, नथ, हिरव्या बांगड्या..... आईही दुसरी गौरच दिसत असते. एरवी उगाच खडूसपणा करणारी आजीही हळूच म्हणते नातीला, " अगं आज दृष्ट काढ बाई तुझ्या आईची ". बाबा आईकडे कौतुकाने पाहत ' आहे बुवा ' असे खुणावतात तसे आई समाधानाने हसते. पाहा किती जणांना एकाचवेळी या आनंदाच्या संसर्गाने खूश करून टाकले.

सगळ्यात संसर्गजन्य बहुतेक हसणेच असावे. अगदी तान्हे बाळही तुम्ही त्याच्याकडे पाहून हसलात की तुमच्याकडे पाहून हळूच गाल वाकडा करते. पुन्हा पुन्हा हसलात की मोठ्ठे बोळके पसरून हसते. त्याच्या त्या निरागस आनंदाने तुम्हाला अजूनच हसू येते. हा संसर्ग अतिशय सुखावणारा. सोसायटीत खेळणारी सात आठ वर्षांची मुले- गृपगृपने खेळत असताना मध्येच खुसुखुसू हसताना दिसतात. एखाद्या नित्यनेमाने कावणाऱ्या आजीने ओरडायला सुरवात केली की जिन्यात लपून किंवा गाडीच्या पाठीमागे दडून आजीचा कानोसा घेत दाबलेले हसू किंवा कोणाचे बाबा हाकारत असतील आणि ते पोर घरी जायचे नाही म्हणून लपून बसले असेल की यांना जाम मजा येते. हसायचे नसतेही आणि ते दाबताही येत नाही.

' आम्हाला सगळ्या जगाची अक्कल आली आहे ' या वयाचे एक वेगळेच जग आहे. एखाद्याला टार्गेट करून त्याची यथेच्छ टिंगल करत हसायचे आणि तेही उघडपणे. ही मुले-मुली सतत हसतच असतात. अकारण-सकारण, अगदी क्षुल्लक निमित्तही त्यांना पुरते आणि मग तोच धागा पकडून ते स्वर्गापर्यंत जाऊन पोचतात. सेलवर बोलतात तेव्हाही बोलणे कमी आणि हसणेच जास्ती. फार हेवा वाटतो मला या मुलांचा. यांना पाहिले की नकळत चेहऱ्यावर हसू उमलतेच.

सकाळी सकाळी प्रसन्नपणे कोणी तुम्हाला शुभेच्छा दिल्या, आवारात पडलेल्या प्राजक्ताच्या सड्यातली चार फुले आवर्जून तुमच्या हातात ठेवली की तो ताजेपणा हृदयापर्यंत पोहोचतो. मग तुमच्याही नकळत तुम्ही तो इतरांनाही वाटता. किंबहुना तुम्हाला आतून वाटणारा, जाणवणारा आनंद चेहऱ्यावर झळकत असतो तो अनोळख्यालाही त्या आनंदाचा यात्री करून घेतो. ही शृंखला तिच्या संसर्गात जोवर दम आहे तोवर अशीच वाढत राहते.

मैत्रिणींचा गोतावळा जमला की मग हा संसर्ग फोफावतो. अग त्यादिवशी ना..... आणी जी सुरवात होते खीखी करत हसायला. इथेही कारणांमध्ये प्रत्येक वेळी दम असेलच असे नाही परंतु मनामध्ये आनंद-सळसळता उत्साह- धमाल करायची असते. या गटाला वयाचे बंधन नाही. इथे अगदी सत्तरीच्या पुढच्या आज्याही एकत्र जमल्या की पदर तोंडावर धरून त्यांच्या तरुणपणातले काहीतरी आठवून किंवा नातू व नातसुनेची कशी नेत्रपल्लवी चालते हे सांगत खुदखुदून हसताना दिसतील. आणि मधली पिढी तर ना घर का ना घाट का अशी असूनही कधीमधी थोडा चावटपणा, तर कधी कॉलेजमधल्या स्टोरीजमध्ये रमून खिदळताना दिसतील.

हसण्याचा संसर्ग हा आपलाच आपल्यालाही होऊ शकतो. भुवया वर कशाला करताय, मी अगदी खरे तेच सांगतेय. तुम्हीही अनेकदा घेतला असेल हा अनुभव. ऑफिसला जायला निघालात, धावतपळत नेहमीची बस/ट्रेन पकडलीत. जरा स्थिरस्थावर झालात आणि कुणावर तरी नजर पडली की.... किंवा अचानक काहीतरी आठवते-फारच गमतीशीर घटना, कुठे काही वाचलेले, ऐकलेले जोक्स आणि मग हळूहळू हसू यायला लागते. आठवण घोळतच राहते मनात, तसे हास्याचे उमाळे येऊ लागतात. शी, लोकं म्हणतील अगदी वेडच दिसतंय प्रकरण. म्हणून दाबण्याचा प्रयत्न पण ते बेटे ऐकेल तर ना...... अगदी आवरेनासेच होते . असे झाले की मनाला द्यायचे सोडून आणि मनसोक्त हसून घ्यायचे. तुमच्या आनंदात लोकही सामील होतील. काय, काय म्हणालात? ते कसे सामील होणार? अहो एकतर म्हणतील खुळीच दिसतेय आणि मग स्वतःही खुळ्यासारखे हसतील नाहीतर त्यांनाही असेच काही पूर्वी घडलेले आठवेल मग त्यांच्या आठवणीच्या राज्यात रमून तेही हा संसर्ग मनमुराद अनुभवतील व ही आनंदाची शृंखला अशीच वाढत राहील.

Tuesday, August 25, 2009

जेव्हा अचानक असे घडते....

तुम्ही रस्त्यावरून नेहमीसारखी गाडी पळवताय. डोक्यात काहीतरी विचार सुरू आहेतच.( विचार कधीतरी पाठ सोडतील का? ) गंभीर-कटकटी/ एखादा जोक आठवून ओठावर हसू आलेय/ आवडते गाणे वाजतेय अन त्याच्या सुरावटीत हरवून तुम्ही अगदी तल्लीन झाला आहात. तुमच्या आजूबाजूला बऱ्याच गाड्या आपापल्या तालात पळत आहेत. पुढची गाडी तुमची लय बिघडवतेय म्हणून तिला ओव्हरटेक करावे या विचारात तुम्ही असतानाच, अरे अरे......... ब्रेक ब्रेक......अजून छातीत धडधडतेय ना? आधीच ओव्हरटेक केले असतेत तर......


फार वैताग आलाय. या बायका सुखाने स्वतः जगणार नाहीत अन नवऱ्यांना जगू देणार नाहीत. कधी कधी वाटते गळाच दाबा...... बापरे! काय भयंकर विचार करायला लागलोय मी या महामायेमुळे. काय करू कशी मुक्ती मिळवू? आयडिया, आयडिया, देवा..........
प्लीज प्लीज....... हुश्श्श्शssss....


सारख्या पार्ट्या पार्ट्या..... अग हो हो आलो बाई. चल चल. निघतात. मोठ्या हॉल मध्ये सगळे जमलेत, मस्त धमाल सुरू आहे. बायको हाकारते, चल रे डान्स करूयात. अं बरं बाईसाहेब, आपली आज्ञा प्रमाण. डान्स करायचाय काय...... डान्स डान्स......


ए काहीही बोलू नकोस हं का. फेकाड्या, म्हणे भूत पाहायचे आहे का? काय खरचं, तू पाहिलेस? चल चल दाखव बरं भूत.

एका प्रसिध्द आयटी कंपनीच्या सिक्युरिटी कॆमेरावर हे भूत सापडले. खरे-खोटे कोण जाणे.

Monday, August 24, 2009

कणसाचे वडे




जिन्नस

* पाच/सहा कणसे.
* उकडलेले तीन मध्यम बटाटे.
* सहा पावाचे तुकडे.
* तळण्याकरिता तेल.
* पाच/सहा लसणाच्या पाकळ्या, चार हिरव्या मिरच्या,
* पेरभर आले, मूठभर चिरलेली कोथिंबीर,
* एक चमचा जिरे, एक चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ.

मार्गदर्शन

कणसे किसून घ्यावीत. इथे मिळणारी कणसे खूप गोड व रसाळ असल्याने किसताना बराच रस निघतो. जास्ती वाटल्यास कणसाचा कीस थोडा पिळून घ्यावा. त्यात उकडलेले बटाटेही किसून टाकावेत. पावाचे तुकडे कोरडेच मिक्सरमध्ये टाकून बारीक भुगा करून टाकावेत. लसूण, मिरची, आले व जिरे वाटून घालावेत. चिरलेली कोथिंबीर, लाल तिखट व मीठ घालून सगळे मिश्रण एकजीव करावे. मिश्रण खूप सैल वाटत असल्यास त्यात अजून दोन/तीन पावाचे तुकडे मिक्सरमधून काढून घेऊन टाकावेत. कढईत तळण्याकरिता पुरेसे तेल घेऊन तापत ठेवावे. चांगले गरम झाले की आच मध्यम करून प्लॅस्टिक पेपरला किंचित पाण्याचा हात लावून वडे थापावेत किंवा हातावरच गोल आकार देऊन तळावेत. सोनेरी रंगाचे झाले की लागलीच टिशू पेपरवर टाकून अतिरिक्त तेल काढून टाकावे. गरम असतानाच सॉस किंवा हिरव्या चटणीबरोबर वाढावेत. सोबत ताज्या स्ट्रॉबेरीजचा थंड मिल्कशेक असल्यास अगदी महाबळेश्वरच्या खयालोमें कधी गेलात कळणारही नाही.

टीपा

आच अजिबात वाढवू नये नाहीतर वरून पटकन सोनेरी होतात परंतु आत मात्र ओलेच राहतात. पावाचे तुकडे ( मग ते स्लाइस असो की बेकरीतले पाव असोत ) नेहमी कोरडेच मिक्सरला टाकून चुरा करूनच घालावेत. म्हणजे ते ओले करून पिळून जो लगदा होतो तो होत नाही शिवाय हा चुरा मिश्रणात नीट एकत्र होतो, तिखट-मीठ व्यवस्थित लागते.

Sunday, August 23, 2009

मंगलमूर्ती मोरया!!!


आले आले वाजत गाजत घरोघरी बाप्पा आले. लहान-मोठे सगळ्यांनीच अतिशय उत्साहाने आपापल्या कल्पनांनी घडवलेल्या मखरात, सजावटीत, रोषणाईत, फुलांच्या सुगंधात व आरतीच्या गजरात मोठ्या दिमाखात विराजमान झाले. सुगृहिणींनि केलेले उकडीचे मोदक व नैवेद्य खाउन तृप्त झाले.
हे गणराया सगळ्यांवर तुझी कृपादृष्टी ठेव एवढेच मागणे आहे.

गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!!

अतिशय मंगलभाव जागवणारी बाप्पांची आरती आपण सतत ऐकतो-म्हणतोच.
पुन्हा एकदा ऐकायचा मोह आवरला नाही.... : येथे ऐका

Friday, August 21, 2009

अजीब दास्तां हैं ये...... (३)

भाग पहिला येथे वाचा

भाग दुसरा येथे वाचा

आज काय झालेय समीरला? मनकवडा झाल्यासारखे का करतोय. ममा म्हणते अगदी तसेच करण्याचा मोह होतोय. सांगावे का मनातले. फार तर काय, म्हणेल वेडी आहेस का दिशा तू. अग अनुजाशी लग्न ठरतेय माझे. किंवा लग्न आणि तुझ्याशी? ना गं, मी तर नेहमीच तुला जवळची मैत्रीण समजत आलोय. पण कदाचित म्हणाला तर... दिशा, तेवढ्यासाठीच तर परत आलोय मी. खरेच असे म्हणेल का समीर? " अग अग दिशा, काय करते आहेस? आत्ता त्या सायकलवाल्याला मारले असतेस तू. लक्ष कुठेय तुझे? " निमा ओरडत होती. मागून रेश्मा व दिल्यानेही हटकले. " अरे बापरे! दिशा सांभाळ गं बाई, उगाच कोणा बिचाऱ्यावर गाडी घालू नकोस बरं का. कसला एवढा गहन विचार करते आहेस? " " बरं बरं कळले, तुम्ही पुढे बघा." असे म्हणत दिशाने सावरून घेतले खरे पण हा गुंता कसा सुटावा?

सगळे रजतच्या घरी पोचले. श्री आणि रजतने पुढे जाऊन थोडी तयारी करून ठेवलेली होती. चिप्स, कोल्ड ड्रिंक्स, पण सगळ्यांना कडकडून भूक लागलेली. हे असले स्नॅक्स प्रकार कोणालाच नको होते. " रजत अरे मी इतका लांब प्रवास करून आलोय ते काय हे चिप्स खायला होय, मुलींनो जरा आपापली पाककला दाखवा ना. मस्त पोहे करा गं. तरसलो आहे मी गेले सहा महिने. " समीर पटकन म्हणाला. आता इतक्या जणांसाठी पोहे म्हणजे किलोभर तर करावे लागतील, सकाळी सकाळी पोरींनाही सुटीचा मूड असल्याने बिलकूल इच्छा नव्हती... मग ढकलाढकली सुरू झाली. तू कर गं, ए मी नाही हं... माझे मुळीच चांगले होत नाहीत, मग कोणी खाणार नाही. शेवटी दिशाने वैतागून म्हटले, " पुरे झाले गं तुमचे, मी करते. खायला मात्र याल पहिल्या. जारे किमान कोणीतरी पोहे घेऊन तरी या तोवर मी तयारी करते. असे म्हणत स्वयंपाकघरात घुसलीही.

"अरे कोणीतरी तिला मदत तरी करा रे. " दिल्या ओरडत होता. त्यावर अनुजाचा आवाज आला, " सम्या पोहे कोणाला हवेत? तुला ना, मग ऊठ चल, जा जा कांदा कापून दे जरा. " टोपलीतून कांदे काढत हे आवाज दिशा ऐकत होती. तेवढ्यात हालचाल जाणवली म्हणून पटकन मागे वळली तो समीर अगदी जवळ उभा होता. संपूर्ण साडेसहा महिन्याने इतक्या जवळून दिशा समीरला पाहत होती. त्याच्या ओठांवरचा कट - लवकट म्हणत असे ती त्याला. त्याच्या परफ्यूम, डिओचा मिक्स सुगंध, कुडत्यामधून दिसणारी भरदार छाती... वाटले झोकून द्यावे स्वतःला. " दे गं ते कांदे इकडे, पोहे हवेत तर मदतही करायला हवी ना तुला. " असे म्हणत तिच्या भारलेल्या अवस्थेकडे साफ दुर्लक्ष करीत समीरने कांदे चिरायला सुरवात केली. पोहे होईतो सगळा वेळ तो दिशाच्या आसपास अगदी जवळ वावरत राहिला. मध्येच अनुजा दोन वेळा डोकावून उगाचच समीरशी गोड गोड बोलून गेली. समीरही अगदी साथ देत होता. असा राग आला होता पण करणार काय, हसून साजरे करणे भागच होते.

पोहे तयार झाले, घरभर वास दरवळत होता. बाहेर सगळे भूक भूक ओरडत होते, आणारे लवकर. दिशाने प्लेट्स भरायला घेतल्या तसे समीरने तिला थांबवत पातेलेच उचलले आणि बाहेर नेऊन मधोमध ठेवले. लिंबे, कोथिंबीर, खोबरे व शेव घेऊन मागोमाग दिशाही आलीच. प्लेट्स, चमचे व दही कोणीतरी जाऊन पटकन आणले आणि हल्ला बोल करत सगळे तुटून पडले. पोहे सुंदरच झाले होते. हातातोंडाची लढाई सुरू झाली. जरा पोटोबा शांत झाल्यावर चहाची फर्माइश आली. दिशाला कल्पना होतीच त्यामुळे तिने बाहेर येताना चहा ठेवलाच होता. " दिशा, समीर चहाचे पाहा रे. आता नाश्ता काम पूर्ण करावेच लागेल. काय रे बरोबर आहे ना मी म्हणतो ते. " सगळ्यांनी हो हो म्हणत श्रीला साथ दिली. पुन्हा दोघांची वरात किचन मध्ये आली.

दिशा कपबश्या शोधत होती तोच तिच्या खांद्याला धरून समीरने तिला स्वत:कडे वळवले, " दिशा, कशी आहेस गं? मिस केलेस मला? " आत्तापर्यंत अनेकवेळा समीरने दिशाला स्पर्श केला होता, पण आजचा स्पर्श वेगळाच होता. निदान दिशाला तरी जाणवत होता. मनाने फितुरी कधीचीच केली होती. आता या स्पर्शाने तर दिशा थरथरू लागली. घाईघाईने कप ओट्यावर ठेवण्याच्या निमित्ताने दिशाने स्वत:ला सावरले. मोकळे हसून समीरचे केस जरासे विस्कटत ती म्हणाली, " मी एकदम चकाचक आहे. आणि तुला मी कशाला मिस करेन रे. ते काम अनुजा करतेच आहे ना? आणि कारे शहाण्या तू तरी कुठे माझी आठवण काढीत होतास? " बोलता बोलता दिशा ओट्याला चिकटली तसे तिच्या दोन्ही बाजूने ओट्यावर हात रोवून, कोंडलेल्या आवाजात समीरने विचारले " दिशा, मी जर तुला सांगितले की मी तुला वेड्यासारखे मिस केले, आत्ताही मी फक्त आणि फक्त तुझ्यासाठीच परत आलोय तर विश्वास ठेवशील माझ्यावर? "

तोच अनुजा आत आली. दिशा अन समीरला इतके जवळ उभे पाहून गोंधळली, " काय रे समीर, नाही म्हणजे सगळे ठीक आहे ना? चुकीच्या वेळी आले का मी आत? तुम्ही काय बोलत होतात? आणि दिशा का अशी थरथरतेय? दिशा अग मी तुला विचारतेय ना? बोल की काहीतरी. तुम्ही तुम्ही दोघे......समीर, तू.....ओह्ह्ह्ह्ह." अनुजा रडायलाच लागली. दोघांकडे पाहत रडत रडत बाहेर गेली. दिशाला समजेचना हे काय चाललेय. तिने समीरकडे पाहिले तर तो अजूनही तसाच भारलेला होता, डोळ्यात प्रश्नचिह्न घेऊन. बाहेर आवाज वाढू लागले . रेश्मा, निमा, रजतच्या हाका येऊ लागल्या, " सम्या, दिशा बाहेर या ताबडतोब. ही अनुजा कशाला हमसून हमसून रडतेय? सम्या ए सम्या....." तशी दिशाकडे पाहत हात झटकून समीर बाहेर गेला.

दिशा, मूर्ख मुली चांगला समीर स्वत:हून विचारत होता. आता तरी सांगायचेस त्याला. नाहीतरी घोळ घातलाच ना, ती अनुजाही इतके कशाला रडतेय कोण जाणे, असे काय घडलेय इथे? आता उगाच मी बदनाम होणार, तेही काही न करता. तोच बाहेरून अनुजाची हाक आली, " दिशा, आता कुठला मुहूर्त शोधते आहेस? बाहेर ये ताबडतोब. " नाइलाजाने दिशा बाहेर आली. नजर जमिनीवर खिळलेली, कोण कोण काय बोलतंय ते ऐकायची तयारी करत होती....पण एकदम शांतता का पसरली आहे. कोणीच काही बोलत नाहीये. डोळ्याच्या कोपऱ्यातून पाहायचा प्रयत्न करीत होती. सगळे माझ्यावर भडकलेत आणि अनुजा तर ...समीर या सगळ्यांच्या तोंडी मला देउन तू कुठे......

समीर दिसला, दिशाचा विदीर्ण चेहरा पाहून तिच्या पुढ्यात येऊन उभा राहिला. तिचे हात हातात धरून गुडघ्यावर बसत म्हणाला, " दिशा, मला हवीस तू. लग्न करशील माझ्याशी? अग मी सदैव तुझ्यावरच प्रेम करत होतो. मला जाणवायचे तुलाही मी आवडतो पण तू नेहमीच तुझ्या परिघात राहिलीस. अनुजा व माझ्या घरच्यांची फार इच्छा होती आमचे लग्न व्हावे पण अनुजा दोन वर्षांपासूनच मनिषच्या प्रेमात बुडलेली आहे. तो पायलट आहे एअर फोर्स मध्ये. दोन महिन्यांनी सुटीवर आला की अनुजाला मागणी घालेल तोवर तिच्या घरच्यांना कळू द्यायचे नव्हते म्हणून मग आम्ही नाटक करत होतो. शिवाय यामुळे तरी तू काहीतरी बोलशील असे वाटत होते. पण तू शांतच राहिलीस. चुकून कधीतरी तुझे डोळे तुला दगा देत आणि मग तुझी होणारी तगमग, अपराधीपण तुझ्या चेहऱ्यावर दिसत राही. मला सहन होईना गं ते. म्हणून कंपनीने विचारले सहा महिन्यांनसाठी जातोस का तर मी हो म्हणून टाकले. वाटले मी लांब गेल्यामुळे तरी प्रेम व्यक्त करशील, निदान तुझे हे अपराधीपण दूर होईल. मी गेलो तुझ्यासाठी पण झाले उलटेच. या सहा महिन्यांत मी तुला अतिशय मिस केले. जिकडे तिकडे फक्त तूच दिसायचीस. अगदी साध्या साध्या गोष्टीही मला आठवत. आत्ता दिशा असे म्हणाली असती, अशी बसली असती. अगदी भिकार सिनेमा पाहतानाही धो धो रडली असती. आणि जाणवले तू जगू शकशीलही माझ्याशिवाय पण मी नाही जगू शकत. पहाटे चारला फोन लावला, पण तू घेतला नाहीस. तेव्हाच सांगणार होतो तुला, दिशू, आय लव्ह यू, चल पटकन लग्न करून घेऊयात. ए अनुजा दे ना गं. दिशू नाही म्हणू नकोस गं या चमेलीच्या कळ्यांची शपथ तुला आहे. "

सगळे श्वास रोखून ऐकत दिशाच्या चेहऱ्याकडे पाहत होते. दिशा भांबावली....... गोंधळली ....... मग रागावली ...... शेवटी मोहरली. डोळ्यांतून आसवे ओघळत होती त्यांना पुसत अनुजाला एक फटका मारून समीरच्या मिठीत तिने स्वत:ला झोकून दिले. त्याच्या कंठावर नाक घासत, " दुष्ट कुठला, किती तरसवलेस मला. वचपा काढेन बघ सगळ्याचा. दामदुपटीने वसूल करून घेईन हा सारा त्रास." असे म्हणत त्याला घट्ट बिलगली.टाळ्या, शिट्यांचा एकच गदारोळ झाला. दिशाला मिठी मारत अनुजा सारखी सॊरी म्हणत होती. पुढे सगळ्या गोष्टी झपाट्याने घडल्या. दिशाच्या ममाला तर कोण आनंद झाला. बाबाही समीरला ओळखत होतेच. समीरच्या घरी अनुजाचे लग्न दुसऱ्याच कोणाशी होतेय हे ऐकून थोडा गोंधळ झाला खरा. पण समीरने सगळे नीट मॅनेज केले. तीन महिन्यातच अनुजा-मनिष व दिशा-समीरचे शुभमंगल पार पडले. पाव्हणे मंडळी पांगली तसे दिशा-समीर मनालीला आले.

लग्न होऊन सहा दिवस झाले तरी निवांत वेळ मिळालाच नव्हता. मनालीला आल्यावर पहिला दिवस कसा गेला ते दोघांना कळलेच नाही. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी थोडे भटकून आल्यावर तृप्त दिशा फ्रेश होऊन आली तेव्हां समीर व्हरांड्यात तिची वाट पाहत उभा होता. तिला घट्ट जवळ ओढून घेत समीरने विचारले, " दिशू, सांग ना गं एकदा...मी आवडतो ना तुला?" आता राहवणे शक्यच नव्हते. दिशाने त्याच्या लव-कटला कुरवाळत हळूच हुंकार भरला. तसे तिला घुसमटवत समीर आरती प्रभूंचे गीत बेभान होऊन गाऊ लागला......







माझी वस्त्रे तुझी झाली पंख सारे मिटले गं
चोचीतले उष्टे थेंब पानोपानी पडले गं
माझी वस्त्रे तुझी झाली तुझी वस्त्रे वारा गं

वाजले गं मी ऐकले गं वाजले गं मी ऐकले गं
माझी वस्त्रे तुझी झाली रंग मात्र फसले गं
डोळे चारी मिटले आणि ओठ ओठा डसले गं

या अवसेच्या रात्री कुठे निघालीस परडी घेऊन
तृप्त फुले झाली गं फुलली तेव्हा सरली गं
आता कुठे उरली गं गंध फुटे गाली गं

परडीभर तरी मिळेल का डोही कुठे चांदणे
कुठे कुठल्या झाडाखाली उभी नको राहूस गं
अजून त्यांची सळसळ नाही जिरली गं

माझी वस्त्रे तुझी झाली तुझी वस्त्रे वारा झाली
गात्रांच्या गारा झाल्या माझी वस्त्रे भिजली गं
दूर तिथे देवळापुढे दीपमाळ विझली गं

तुझी वस्त्रे कुठे गेली माझी वस्त्रे तुझी झाली
परडीभर चांदण्यांनी देहपूजा सजली गं
परडीभर चांदण्यांनी देहपूजा सजली गं........



अजीब दास्तां हैं ये...... (२)

भाग पहिला येथे वाचा

भाग तिसरा येथे वाचा

गाण्याच्या नादात..... का ठंडी हवाच्या नादात दिशा स्टेशनवर पोचली, गाडी स्टँडवर चढवून दोन नंबरवर जायचे म्हणून पुलाकडे वळली खरी पण मन काही पुढे जाईना. काळजात हुरहुर, पोटात फुलपाखरे उडत होती. " ए लडकी, आज बहोत नादान बन रही हो. नक्को करू ऐसा..... क्यूं न करू? मेरी जान तुझे तो सब पता हैं, फीर भी...?" स्वतःशीच अविरत चालणारा झगडा पुन्हा जोर धरत होता. तोच कोणीतरी हाक मारतेय असे वाटून दिशा वळली आणि पाहते तो काय समोर संपूर्ण गृप उभा अन मधोमध समीर.

माझा आवडता पांढरा शुभ्र चिकनचा झब्बा, नुकतीच अंघोळ केली असावी - त्यामुळे तकाकणारा चेहरा, तेच जीवघेणे स्माईल, डोळ्यात आर्जव...... आईगं, का जीव घेतो आहेस असा माझा समीर. " दिशू, पुलाकडे नको इकडे वळव पावलांना. अग या गाड्यांच्या गोंधळात अन मरणाच्या गर्दीत कुठे निघालीस? आम्ही सगळ्यांनी दांडी मारायचे ठरवलेय, शिवाय हा सम्याही अचानक उगवलाय तेव्हा मस्त धमाल करूयात. याला पिडूयात. रजतच्या घरी कोणी नाहीये. त्याच्या नवीन नोकरीची प्री-पार्टी आज उकळूयात. तुझीच वाट पाहत होतो, चल चल. " अनुजा उत्साहाने चिवचिवत होती.



बापरे! दिशा आज तू गयी काम सें. हे लोक तुला सोडणार नाहीत. समीर बोलत नाहीये काही पण या सगळ्यांना यानेच फूस लावली असावी. अनुजाचा उत्साह बरोबरच आहे, पण माझे काय? समीर संध्याकाळी पाच मिनिटे एकटा भेटला असतास....... तेवढेच पुरेसे होते रे मला. आता दिवसभर समोर असशील, तुझ्या नेहमीच्या पद्धतीने सगळ्यांना अवतींभोवती नाचवशील मला मात्र अवघडल्यासारखे होईल. काय, काय करते आहेस दिशा? आधीच तुझा चेहरा पारदर्शी आहे. सगळे कसे टक लावून वाचायचा प्रयत्न करत आहेत बघ तुला. टर्न बेबी टर्न.

रुमालाने चेहरा, केसांवरचे पावसाचे बिंदू अन सम्याची आस टिपत लटक्या रागाने, " सम्या या सगळ्यांना माहीत होते ना तू येणार आहेस ते? अन मला पाहाटे चार पासून कॉलून नुसते भंडावून सोडलेस. थांब आज तुला कशी धोपटते बघ. अनुजा तूपण हात धुऊन घे गं. चला लेको, आता तुम्ही सगळे तयारीनिशी आला आहात तेव्हा आपली सपशेल शरणागती. असेही ' मरे ' मेलीच आहे, सायबाला सांगते मी लटकलेय. ना इस स्टेशन में ना उस में बीचमेही अटकलेय. आणि आमच्या मातोश्रींनाही.... " तिला मध्येच थांबवत, " अग काकूंना सम्याने सांगितले सुद्धा, तुमच्या लेकीला पळवून घेऊन जातोय म्हणून. दिशा तुझी आई म्हणजे, एकदम कूल आहे गं. समीरला म्हणाली, तूच पळवतो आहेस ना? मग मला काळजी नाही. नाहीतर आमच्या मातोश्री, हजार प्रश्न विचारतील. " अनुजाची गाडी पुन्हा सुरू झाली.

ममा म्हणजे पण कमाल आहे अगदी. आणि हा समीरपण ना...... दिशाने त्याच्याकडे पाहिले तर तो टक लावून तिच्याकडेच पाहत होता. आरपार उतरत जाणारी नजर, नो नो समीर आता पुरे. आता लाइट मूडमे जानाही पडेगा. नाहीतर ये बेइमान आँखे भांडा फोड देगी. " अनुजा, आता इथेच गर्दी करत उभे राहायचे का? लेडीज डब्बा समोरच आहे, अचानक एकवर गाडी लावतील अन मी पटकन उडी मारून तुम्हा सगळ्यांना टुकटुक करून पळून जाईन हं. मग मला दोष देऊ नका. तेव्हा हला इथून. रजतकडेच जायचे ना रे? गाड्या कोणी कोणी आणल्यात?" " दिशा निमा, दिल्या व रजतला कॉंट्रॅक्ट बसवरून उचलून आणल्याने त्या तिघांकडे गाडी नाही. समीरची बाइक बरेच दिवसात चालवली नसल्याने रुसलीये. या तिघांना घ्या रे कोणीतरी वाटून. मी रजतला घेतो, मुद्देमाल आपल्याकडे हवा बाबा. आम्ही दोघे होतो पुढे तुम्ही यारे मागोमाग. " असे म्हणून श्री रजतला घेऊन निघालाही.

मिळालेली सुटी, अचानक आलेला समीर आणि संपूर्ण गृप जमल्याने सगळ्यांचा मूड मस्त बनत चाललेला. भराभर गाड्या निघाल्या. अनुजा समीर, दिशाला निमा चिकटलेली, दिल्याला रेश्माने पाणीपुरी खिलवशील असे वदवून लिफ्ट देऊ केलेली. सई, अशोक आणि केतन आपापल्या गाड्या घेऊन पुढे सटकलेही. स्टेशनच्या हाणामारीतून बाहेर पडून एकमेकाच्या टप्प्यात आले. तलावपाळीला प्रदक्षिणा घालता घालता अनुजाने मध्येच गाडी थांबवली. मागोमाग सगळे थांबले. " काय अनुजा, आता इथे कशाला स्टॉप?" केतन वैतागला. एकतर सगळ्यांना भुका लागलेल्या. " अरे थांब रे जरा केतन, निमा, दिशा या ना पटकन. आख्खी पाटीच घेऊयात का?" असे म्हणत अनुजा तरातरा चालू लागली. पाहिले तर ती गजऱ्यांनि भरलेल्या पाटीशी पोचलेली. पोरांनी कठीण आहे रे या मुलींचे, कधीही कुठेही यांना काहीही दिसते की निघाल्या, वगैरे सुरवात केली. मोगऱ्याच्या टपोऱ्या कळ्यांनी गच्च विणलेले गजरे निमा व अनुजाने घेतले. दिशाने चमेलीच्या अर्धवट उमललेल्या कळ्यांनी गुंफलेले संपूर्ण गुंडाळेच उचलले.

सगळे पुन्हा आपापल्या गाड्यांवर बसले तोच समीर गुणगुणतोय असे वाटून दिशा कान देऊन ऐकू लागली. समीर खरेच गुणगुणत होता. दिशाचे आवडते गाणे, नेमके आज. आत्ताच.....


रिम-झिम गिरे सावन, सुलग सुलग जाए मन
भीगे आज इस मौसम में, लगी कैसी ये अगन
रिम-झिम गिरे सावन ...

जब घुंघरुओं सी बजती हैं बूंदे,
अरमाँ हमारे पलके न मूंदे
कैसे देखे सपने नयन, सुलग सुलग जाए मन.......





क्रमश:






Thursday, August 20, 2009

अजीब दास्तां हैं ये......

पावसाने जोर धरला होता. पहाटेच उठून माझ्या रूमची खिडकी सवयीने उघडली होती. मस्त ओले थंडगार वारे अन मध्येच पावसाचे तुषार आत झेपावत होते. जरासे कुंद वाटत होते पण मला आवडतो पाऊस. रह रहके समीर समोर दिसत होता. अरे हो, मी - दिशा. जिथे आनंद, चैतन्य भरभरून नांदत असेल तिथेच मी रमते. आयुष्याला ओझे समजून वाहणारे लोक पाहिले की फार त्रास होतो मला. मी त्यांना सरळ नजरेआड करते. ही अशी जमात आहे ना की त्यांना कोणीही कितीही समजावले तरीही ते करंटेच राहणार. तेव्हा छोड दो. हां आता अगदी जवळचे काही असे वागतात ना तेव्हा चांगली हजेरी घेते त्यांची.

परवाचीच गोष्ट, रजत दोन दिवस डोक्याला हात लावून बसला होता. मान्य आहे नोकरी जाते का राहते हेच कळत नव्हतं त्यामुळे फार अस्वस्थ वाटत होत. पण असे न खाऊन, सुतकी चेहऱ्याने बसून काय होणार होते. नोकरी जायची तर जाणारच होती. त्यापेक्षा वाईटच घडणार आहे असे गृहीत धरून जॉब ऍप्लिकेशन्स कर म्हणून किती समजावलं तेव्हा कुठे हातपाय हालवले. त्याचे लक जोरदार होते, नोकरी गेली नाहीच पण नवीन नोकरीचे दोन कॉल्स आले. इंटरव्यूव्ह ही झाले आणि रजत आत्तापेक्षा चांगल्या कंपनीत व एक स्टेप वर पर्फेक्ट पॆकेज मिळवून पंधरा दिवसात जॉईन होतोय.

दिशू फक्त तुझ्यामुळे झाले बघ हे सगळे असे म्हणत होता. वेडाच आहे, सगळे तूच केलेस रजत फक्त असे हातपाय गाळून बसण्यापेक्षा तू किती आणि कशा कशात यश मिळवू शकतोस याची उदाहरणे देऊन देऊन मी तुला भंडावून सोडले. शेवटी कोपरापासून हात जोडत या शरणागतास जीवदान द्या देवी असे म्हणत तू उठलास अन हे फळ मिळाले. ती निमाही तशीच सदा रडतराउ, तिला तर कारणही लागत नाही. थोडे झापडले की येते ताळ्यावर मग दिलखूश हसते. म्हणते," खरेच दिशे तू नुसती आजूबाजूला असलीस ना तरीही मस्त लाइट मूड राहतो." अरे पण मी कशाला हवी सतत. तुम्ही स्वतःच बना की आनंदाचे कारण. ह्म्म्म्म, मरो. कधी न सुधारणारे गाडे आहे यांचे.

आता इतका मस्त पाऊस लागलाय, छान आले- गवती पात घालून आईने सही चहा बनवलाय. तो घेत केनच्या झोपाळ्यावर बसून मी भिजतेय पण आमच्या गृपमधले तिघेचौघे चिडचिडत असतील नुसते. रेश्मा तर नंबर एक आणि शेखर म्हणजे, पोचलाही असेल स्टेशनवर. आता मध्यरेल्वे म्हणजे जरा चार थेंब शिंतडले की आमची रडारड सुरू. सुखाने उबदार दुलईत गुडुपं झोपायचे सोडून हा बसला असेल सात पासून प्लॅटफॉर्मवर. दिशे चल जरा खबर घे त्याची, कुठे गेला माझा सेल? अरे काल तर इथेच........, हां सापडला. चार मिस कॉल, कमालच झाली. कोण बरे हवालदिल झालेय एवढे? ओहह्हह, समीर. सही यार दिशा, दम हैं तुझमें....पहाटेपहाटे आठवण काढत होतीस ना. हा अल्याड कधी आला? गेल्याच आठवड्यात चॅट केले तेव्हा बोललाही नाही येतोय ते. सहा महिन्यांनपूर्वीच तर गेला होता मग........ आणि पहाटे चारला पहिला कॉल, काहीतरी घोळ घातला वाटते. समीर तरी मी तुला म्हणत होते सुखाचा जीव दुःखात घालू नकोस. हातचे सोडून पळत्याच्या मागे धावायची सवय जायची नाही रे तुमची. नोकरीच काय प्रेमातही तुम्ही सारखे उडाच इकडेतिकडे. छे! कधी कळणार रे तुला?

तोच पुन्हा सेल वाजतो, समीरचाच नंबर दिसतो. तशी, " हाय, हँडसम. तू कधी आमच्या देशात टपकलास? आणि काय पहाटे चारला पहिला कॉल, अरे मी मस्त गुरगुटून झोपले होते छान छान स्वप्ने बघत. ती सोडून तुझा कॉल घेईन असे वाटलेच कसे तुला?" पलीकडून काहीच आवाज येत नाही. काय झाले असावे बरे, " सम्या गाढवा आता बोलशील का काही का ठेवून देऊ फोन? काय, काय अरे मला ऐकू येईल इतक्या आवाजात तरी बोल. आणि रडतो आहेस का तू? काय झाले समीर? अनुजा कुठेय? भांडलास का पुन्हा? सॊरी बहुवचनात विचारते, तुम्ही भांडलात का एकमेकांशी? छान. अरे इतके हजारो मैलांचे अंतरही तुम्हाला रोखू शकत नाही म्हणजे शर्थ झाली तुमची. आणि काय रे, तू इकडे कसा? नाही म्हणजे, जॉब गेला- सोडला? ओके. संध्याकाळी सात वाजता नेहमीच्या ठिकाणी. चल देन. वडापाव हाण कोपऱ्यावर जाऊन आणि मस्त ताणून दे. संध्याकाळी भेटूच, डोक्याला आराम दे तोवर....बाय बाय. " चला हसला थोडंसं तरी. हा सम्या म्हणजे, मोजून दहा शब्द बोलला. काहीतरी बिनसलेले दिसतेय. याच्या नादात चहाही गार झालाय आणि पाऊसही हिरमुसलाय. शी यार समीर, ठंडी हवा का झोका बनके रहो बोल बोल के थक गयी में, पर तू सुनताच नही.

आईची हाक येते, "दिशा... ए दिशा, अग उठलीस ना? ऑफिसला दांडी मारून चालणार नाही. म्हणजे तूच काल म्हणालीस ना असे त्याची आठवण करून देतेय. हो नाहीतर म्हणशील, का हाकलते आहेस घराबाहेर?" " ममा, मी उठलेय कधीच, अग सम्या अवतरलाय पहाटे पहाटे. संध्याकाळी उशीर होईल गं. मी बाथरुम मध्ये घुसलेय." आरशात स्वतःला पाहते, चेहरा जरा जास्तच खुललाय. समीर, माझा समीर...... चूप. दिशा, काय..... ताळ्यावर राहा. समीरला मनात दडवून ठेवायचे ठरलेय ना, मग? खसखसून तोंड धुते, समीर अनुजाचे लग्न ठरतेय हे लक्षात ठेव. हॆं म्हणे लग्न ठरतेय...... सारखी तर भांडत असतात. असू दे ते पाहतील भांडायचे का लाडात यायचे ते. संध्याकाळी चेहरा कोरा राहायला हवा. समीर तुझा नाही, कधीच नव्हता.... हे दिवसभर घोकत राहा. लडकी खुद को सम्हाल, रेस्ट यू वील मॅनेज. चल हस बरं आता. आरशातल्या दिशाला सलाम ठोकते अन खुदकन हसते. भरभर तयार होऊन आईकडे येते. " दिशा, अगं काय खास? खूप दिवसांनी मरून कलरचा तुझा आवडता चुडीदार घातलास, सुंदर दिसते आहेस. पण हे काय, फक्त घड्याळ. कानातलेही नाही घातलेस? थांब, मोत्याचे टॉप्स घाल हे. हा..... आता कसे. बरं हे घे सँडविच, गाडीत खा गं. पळ आता. "

" बाय ममा, संध्याकाळी उशीर...... गेले गं. " जाते. " कारटी मुद्दाम करेल, किती वेळा सांगितलेय येते म्हणावे पण छे..... वर काय तर म्हणे बाँबस्फोट झाला त्यातल्या सगळ्यांनी येत्येच म्हटले होते ना घरच्यांना...... दिशू तू कितीही लपवलेस तरी मला माहीत आहे तुला समीर आवडतो. एकदा तरी त्याला सांगायचेस ना मनातले. पण तू ऐकणार नाहीस कोणाचे..... " सुस्कारा सोडत आत जाते. स्कूटीवर दिशा गुणगुणत असते, " अजीब दास्तां हैं ये, कहाँ शुरू कहाँ खतम,ये मंझिले हैं कौनसी, न वो समझ सके न हम.........."

क्रमश:

Monday, August 17, 2009

तुझ्याशिवाय.......

धुवाधार बरसणाऱ्या पावसात, माझ्या ओढणीच्या आडोशाला न जुमानता.....
ओलेचिंब भिजलो अनेकदा आपण......
तरीही कसे कोण जाणे, आपल्या मनांना कोरडेच ठेवलेस तू.
म्हणायला असायचास रे माझ्याजवळ......
अगदी चिकटून.... एका पांघरुणात पण त्या कुशीवर...... तुझ्या मनाला आजकाल स्पर्शात उतरवणे बंद करून टाकले आहेस तू.
माझे अविरत पाझरणारे अश्रूही दिसत नाहीत तुला.... का?
तूच म्हणायचास ना, उपेक्षा ही दाहक असते..... जाळत राहते, मग
मग, मला अशी तरसत ठेवून इतका शांत, निवांत झोपी कसा जातोस तू?
उन्हातलं चांदणं मनमुराद वेचणारे आपण, आजकाल चांदण्यातही असे पोळतोय.....
मी अस्वस्थ आहे पाहून जवळ घेतलं होतंस मला..... आठवतंय ना,
का तेही आता विस्मरणात गेलंय?
माझ्या एकटेपणावर तुझ्यामुळे मात करायला शिकले होते रे.......आज,
आज पुन्हा फिरून त्याच वाटेवर... तूच आणून सोडावंस.....
किती तरी अनोळखी आपलेसे झाले पण तुझ्या कुशीत असूनही अनेकदा मी परकीच राहिले.......आणि,
आणि, मला जे हवं होतं ते तुला कळूनही तुझ्या मनातच राहिलं.... का?
मी आहे तुझे सत्य, माहीत आहे तुला..... एकवारच देऊन जा ते तुझ्या ओठातले शब्द.......
स्वतःला उगा असे फसवू नकोस.... त्या अलवार भावनेला तू असे लपवू नकोस....
तुझा जीव आहे माझ्यावर हे जाणून आहे मी....... पण तेवढं पुरेसं असतं का जगायला?
एक अधुरं तडफडणारं मन आहे त्याचं काय...... एवढही समजत नाही तुला? तरीही.....
तुझ्यामाझ्यातले हे अदृश्य पटल..... त्यात धूसर होत चाललेला तू.....
किमान माझ्या मनातला संभ्रम तरी दूर करून जाशील?
किनाऱ्यावर झेपावणाऱ्या भरतीच्या लाटेसारखे सुखात निथळून टाकले होतेस.....
तेव्हा हेही सांगायचेस ना, जाणीवपूर्वक चिंब भिजून सुख भिनवून घे अंगभर.....
माझा मलाच भरवसा नाही तिथे मी तुझा-तुझ्यापाशी असणार नाही.......
वरचेवर म्हणालास, कधीतरी तरी काहीतरी माग गं....... किमान,
किमान, मी तुला काही दिले होते या आठवणीसाठी तरी माग.....
मी न मागताही तू इतकं दिलंस की आता मागण्यासारखं काही उरलंच नाही....... तुझ्याशिवाय.

Friday, August 14, 2009

माँ तुझे सलाम!

This summary is not available. Please click here to view the post.

रात्र वैऱ्याची आहे....

आज सकाळी आवरून नेहमीप्रमाणे नवरा ऑफिसला निघाला तोच शेजाऱ्याने हटकले. नवऱ्याने हाय केले, कसा आहेस? असे विचारताच तो म्हणाला, " माझी गाडी काल रात्रीतून चोराने उघडली आहे. तुमची गाडी माझ्या गाडीशेजारीच लावलेली आहे तेव्हा पाहा जरा सगळे काही नीट आहे ना? " मी दारात उभे राहून हे संभाषण ऐकत होते. क्षणभर ठोकाच चुकला. " अरे देवा! हे काय घडतेय? " तोच नवऱ्याने हाक मारून गाडीची किल्ली दे गं म्हटले. मी किल्ली दिली. मनात विचार भरभर धावत होतेच, काय काय होते गाडीत? सध्या लेक व त्याचा मित्र आल्यामुळे ही गाडी तो चालवतोय. लेटेस्ट जीपीएस सिस्टिम होती. कदाचित त्याचा आयफोनही गाडीत असू शकेल. ( पोरं कुठेही काहीही ठेवतात... ) गाडी मध्ये शक्यतो काहीही ठेवायचे नाही ही शिस्त आम्ही दोघांनी पहिल्यापासून पाळली आहे. दररोज जीपीएस घरात आणतोच. नेमके लेक आल्याने तो कुठे चुकू नये म्हणून त्याला दिलेले, अन त्याने नक्की घरात आणलेले नव्हते. तोवर नवऱ्याने गाडी उघडली, पाहिले तर समोर जीपीएस दिसेना. दोन्ही पोरे झोपलेली. तोच नवरा म्हणाला, " आहे गं, ड्रॉवरमध्ये ठेवला होता त्याने. नशीब तेवढे तरी केले होते. नाहीतर नक्की गेलेच असते. आता तरी ठेव घरात. " असे म्हणत, माझ्या हातात ठेवले व शेजाऱ्याकडे वळला. बरे झाले तू सांगितलेस असे म्हणून त्याचे आभार मानून त्याला धीर देऊन नवरा ऑफिसला गेला.

शेजाऱ्याला हेलो करत विचारले की तुझे काही मौल्यवान सामान तर नव्हते ना गाडीत? दुर्दैव, त्याचे बरेच नुकसान झाले होते. एकतर त्याने गाडीत रोख रक्कम ठेवली होती. गाडीत कशाला बरे ठेवायची? घरात ठेवली असती तर... पण कदाचित तो विसरला असेल किंवा गाडीत जास्त सुरक्षित आहे असे वाटले असेल....
शिवाय काही घरातले सामान होते - हल्लीच तो इथे राहायला आलाय-अजून घर लावतोय . पोलिसांना फोन केलास का? असे विचारले तर त्याने नुसतेच खांदे उडवले. मी जास्त काही प्रश्न न विचारता ( आधीच तो त्रासलेला ) त्याला धीर देऊन घरात वळले. मनात मात्र धस्स झाले आहे.

इथे आलो ( दहा वर्षांपूर्वी ) तेव्हापासून सुदैवाने चोरी प्रकार फारसा ऐकीवात आला नव्हता. जुन्या गावात तर अनेकदा मी स्वतःही मागच्या दाराने ( लॉक न लावता - निव्वळ मूर्खपणा, कितीही सुरक्षित असले तरीही असे वागू नये. काळजी घ्यायलाच हवी नाहीतर मोठा फटका बसू शकतो. ) जवळच असलेल्या बागेमध्ये चालण्यासाठी जात असे. जितके वेळा मायदेशात आलो - किंवा इथेच फिरायला गेलो तितके वेळा घराच्या आवारात अनेक गोष्टी तश्याच ठेवून आलो. डेकवर पॅटिओ सेट, बारबेक्यू ग्रिल, सायकल, कुंड्या, घराच्या दर्शनी भागात - पोर्च मध्ये छानसे टेबल-खुर्च्या, बेंच, आवारात बागकामाचे साहित्य, अनेकविध गोष्टी पण कधीही काहीही जागचे हाललेही नाही. सगळेच दिवसभर ऑफिसात - मुले शाळेत, अनेकदा लोक मुख्य दरवाजा नुसताच ओढून घेऊन जात. एकदा तर आमच्या ओळखीची फॅमिली फिरायला म्हणून शिकागोला गेले. नेहमीप्रमाणे आवरून निघेतो उशीर झालेलाच, घाईघाईत दार लावायचेच विसरले. त्यांच्या आजूबाजूलाच आम्ही पाचसहा भारतीय राहत होतो. आमची मुले खेळत होती, त्यांच्या मुलांना बोलवायला गेली तर काय घरात कोणीच नाही. आली सांगत घर उघडे आहे व घरात कोणीच नाहीये म्हणून. हे कळेतो पाच-सहा तास गेले होते परंतु सारे काही सुरक्षित होते. अगदी क्वचित कधीतरी भुरट्या चोऱ्या त्याही विशेषतः मुलांच्या सायकली चोरीला गेल्याचे ऐकू येई, बास.

सध्या आम्ही राहतो तो भाग शांत व सुरक्षित समजला जातो. गेल्या वर्षी असेच समर मध्येच मुलांच्या सायकली चोरील्या गेल्याचे एकले होते पण मग पोलिसांनी कम्युनिटीची एक सभा घेतली, थोडी गस्त वाढवली - बरेचदा आमच्या ह्या भल्या मोठ्या कॉंप्लेक्स मध्ये पोलिस फिरताना दिसत. त्यानंतर पुन्हा अनुचित प्रकार घडल्याचे ऐकायला मिळाले नव्हते. तोच आज पुन्हा ही घटना घडली. ह्या जागतिक मंदीने फार भयावह दिवस आणलेत. आधीच मिशिगन ची अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. एकेकाळी प्रसिद्ध असलेले हे मोटॉउन अगदी बरबाद झालेय. तीनही मोठ्या मोटार कंपन्यांनी जाहीर केलेली दिवाळखोरी, प्रचंड नोकर कपात याने वाढती बेकारी. चोरीमारी-गुन्हेगारीकरीता पूर्वीपासूनच बऱ्यापैकी बदनाम असलेले हे राज्य आता आणिक किती दुर्दैव झेलणार आहे कोण जाणे. आज नकळत मनात भीतीने शिरकाव केला आहे.

Thursday, August 13, 2009

मला धुऊ नकोस गं.....


छे! फारच खराब झालीये रे आपली गाडी, नुसती धुळीची पुटे चढलीत. धुवायला हवी लवकर. लांबच्या प्रवासाहून आलो की, किंवा गाडी नुसतीच महिनाभर एकाजागीच उभी असेल तर धुळीने माखते. सहजच आपण उगाच काहीतरी रेघोट्या, अक्षरेही काढतो त्यावर परंतु या धुळीने भरलेल्या मागच्या वा खिडक्यांच्या काचांवर असा आगळा प्रयोग करावा असे आले स्कॉटच्या मनात.

थोडीशी कल्पकता, अंगभूत कला व काहीतरी वेगळे करण्याची ऊर्मी असेल तर मार्ग आपोआप समोर येतो. माझ्या मनात फार आहे अमुक करावे परंतु कसे करावे..... साधन सामुग्रीच नाही. अशा प्रकारच्या नकारघंटा काहींच्या मनात कधीच वाजत नाहीत. जे जसे असेल तसे वापरून त्याचा नेमका उपयोग करून घेतात. त्यातलाच हा ' स्कॉट वेड - Scott Wade '.

चित्र काढायला हात शिवशिवत होते, समोरच धुळीने माखलेली गाडीची काच होती. बस, अजून काय हवे. काचेलाच बनवला कॅनवास व बोटे, पेस्पीकोला खाऊन फेकलेल्या काड्या, रंगाचा ब्रश यांच्या साहाय्याने भरभर कल्पनाशक्ती काचेवर चितारली जाऊ लागली. धुळीचा असाही उपयोग होऊ शकेल असे कोणाला सांगून खरे वाटले नसते. नुसताच उपयोग नाही तर खरेच किती सुंदर दिसत आहेत पाहा ही चित्रे. स्कॊट ने ह्या त्याच्या आर्टवर्कमध्ये जीवनमान, काळ-समय, प्रसिद्ध व्यक्ती, समाज-वर्तमान-घडामोडी व्यक्त केल्यात. या अशा सुंदर चितारलेल्या गाड्या कोणाला धुवाव्याश्या वाटतील का?. lol . इतक्या धुळीने भरलेल्या गाड्या सारख्या कश्या बरे मिळणार म्हणून स्कॊट आता स्वत:च अशा काचा तयार करतो- तेलाच्या लेपावर माती-वाळू, वगैरे ओतून ड्रायरने वाळवतो. या अश्या चितारलेल्या गाड्या सिग्नलला थांबल्या किंवा रस्त्याने जात असल्या की अनेकजण थांबून पाहतात. अप्रतिम.





















Wednesday, August 12, 2009

तुझेच हात

सांवरीच्या कापसागत मन हल्लक झाले
तुझ्यासवे वाऱ्यावर, उडाया उत्सुक झाले

हलक्या हलक्या जलधारा बरसती
माझिया डोळ्यात, तुझी आठवण झरती

सभोवताली वेढली धुक्याची चादर
सले विरहाची वेदना, उरी अपार

तुझ्या स्पर्शासाठी अवघा देह आसुसला
गात्रागात्रातूनी श्वास, तुझा हुळहुळला

गौर कांतीवर तुझ्या अधरांची मोहर
प्रणयास उत्सुक, कामिनी चतुर

तुझ्या माझ्या मिलनाचे फुलले मळे
अंकुर रुजला, गर्भात उमलले कळे

जिवापाड जपेन आपल्या बाळाला
तुझे डोळे, तुझे हात असावे सानुल्याला

भरेल तो माझा सुनासुना एकांत
तरळता अश्रू, पुसतील तुझेच हात

Tuesday, August 11, 2009

विरळाच.....

कोण रे तो, दुसरी जागा सापडली नाही का? खरा मोकळा अनुभव देतोस का रे......

हॆं, घालवली ना फुकट, वेडाच आहे अगदी.

बापरे! अरे पाण्यात तरी सोड ना स्वभाव

आता मात्र शर्थ झाली

हे फक्त आपल्याकडेच घडू शकते
अतिथी देवो भव

सही समतोल-खिसाही सलामत

भन्नाट. रेट किती असेल बरं?

अरे आलोच, मस्त हवा खातोय ना. या तुम्हीपण.......:)

अग थांब थांब, मी राहीलो ना मागे


माझ्याकडे दुर्लक्ष करतोस काय?


अरे! मला वाटले असे फक्त सिनेमातच घडते

कुठेही कसाही लटकेन पण कर्तव्याला चुकणार नाही

अथांगतेचा आस्वाद

भिंतच सरकतेय जणू

जिकडे तिकडे नाक खुपसायची सवय जायची नाही तुझी

पळव पळव रे जोरात. नाहीतर हाडेही सापडायची नाहीत.

कोणीतरी ही चित्रे मेलमध्ये धाडलीत. मला आवडली. शीर्षके मी टाकलीत.

Monday, August 10, 2009

रात भी है कुछ भीगी भीगी.......


काही गाणी मनात खोलवर रुतून बसतात. किंवा असेही म्हणता येईल त्या गाण्यांचे बोल, त्यांचा भावार्थ, संगीत आपल्या हृदयाला इतके भावते की आपले मनच त्यांच्यात अडकून पडते. जोडलेले गाणे अतिशय गाजलेले आहेच, परंतु या गाण्याच्या शब्दांकडे मी मुद्दामहून लक्ष वेधू पाहत आहे. शिवाय गाणे आपण कुठल्या मनस्थितीत प्रथम ऐकतो, याचाही ते आवडण्यामध्ये फार मोठा वाटा असतो. कधी कधी एखादे गाणे प्रथम ऐकून अजिबात आवडत नाही. परंतु वारंवार ऐकले तर आपसूक आपण गुणगुणतो म्हणजेच शब्द आवडू लागतात अन संगीतकाराच्या जादुई गेयतेमुळे ते गाणे मनात रेंगाळते. मग एखाद्या विवक्षित क्षणी ते तुमचा कब्जा घेते. अनेक आवडती गाणी आहेत त्यातले आज सकाळपासून सारखे हेच मनात ऐकू येतेय, कदाचित तुम्हालाही आवडेल.

सोबत या गाण्याचे बोल दिलेत व चित्रफीतही दिली आहे. हे सुंदर विरहीणीची आर्तता व्यक्त करणारे तरल शब्द आधी आपला ताबा घेतात. चित्रफीत पाहताना वहिदाची अदाकारी, अप्रतिम रूप वेड लावते. व्यक्तिशः: मला या गाण्याचा प्रसंग फार भावलेला नाही. वहिदाला असे बाजारात दाखवण्यापेक्षा हिच विरहीणी घरात, एकांतात दाखविली असती तर जास्त वजनदार झाली असती. ( माझे मत ) अर्थात चित्रप्रसंग कसाही असो गाणे जीवलग आहेच.


मूळ कवी: साहिर लुधियानवी, चित्रपट: मुझे जीने दो, १९६३

रात भी है कुछ भीगी भीगी

रात भी है कुछ भीगी भीगी, चांद भी है कछ मद्धम मद्धम।
तुम आओ तो, ऒंखे खोले, सोयी हुई पायल की छमछम॥धृ॥

किस को बताएं, कैसे बताएं, आज अजब हैं दिल का आलम ।
चैन भी हैं कुछ हल्का हल्का, दर्द भी हैं कुछ मद्धम मद्धम ॥।१॥
छमछम छमछम छमछम छमछम

तपते दिल पर यूं गिरती हैं, तेरी नजर से प्यार की शबनम ।
जलते हुएं जंगल पर जैसे, बरखा बरसें रुकरुक, थमथम ॥२॥
छमछम छमछम छमछम छमछम

होश में थोडी बेहोशी हैं, बेहोशी में होश हैं कमकम ।
तुझको पाने की कोशिश में, दोनो जहॊं से खो S गए हम ॥३॥
छमछम छमछम छमछम छमछम

गाणे इथे ऐका: http://www.youtube.com/watch?v=6jHCOLUsW6I

Sunday, August 9, 2009

उपमा

पोहे, सांजा, उपमा, शिरा... तसे पाहायला गेले तर सारखे होणारे अल्पोपाहाराचे प्रकार आहेत. सोपे व झटपट होणारे. परंतु प्रत्येकाची स्वतःची एक प्रकृती आहे. वाटतात सहज सोपे म्हणून कसेही केले तर घास लागतो. लग्न झाल्यावर जेव्हा जेव्हा उपमा केला त्या प्रत्येक वेळी नवऱ्याने नाईलाजाने खाल्ल्यासारखाच खाल्ला. कधीही ' वा! मस्त झालाय गं. ' हे वाक्य ऐकले नाही. बरं त्याला उपमा अतिशय आवडतो, दररोज सकाळी उडप्याकडे जाऊन, " एक उपमा एक्स्ट्रॉ सांबार व साधा नरम डोसा " खाल्ल्याशिवाय त्याची गाडी पुढे सरकतच नसे. मग माझा उपमा का बरे आवडत नाही त्याला... हा विचार मला छळू लागला होता. शेवटी एके दिवशी एकटीनेच जाऊन उडप्याचा उपमा खाल्ला. सुंदरच लागला. लुसलुशीत-साजूक तुपाचा गंध, किंचित ऑफव्हाईट रंगाचा( दृष्यस्वरूपही तितकेच महत्त्वाचे आहे ना ), खमंग, मध्येच गोडसर व शेवटी रेंगाळणारी मिरचीची चव, उडीद व मेथीचा मस्त स्वाद अन दाताखाली येणारे काजूचे तुकडे. अहाहा! यापुढे माझा उपमा कसा चांगला लागावा? मग ठरवले उडप्यासारखा झाला पाहिजे. दोन-तीन प्रयत्नात जमला. अन एक दिवस रविवारी सकाळी करून नवऱ्याला दिला, दोन घास खाल्ले आणि पटकन म्हणाला, " काय आज सकाळी सकाळी शिवाप्रसादला गेली होतीस का? " जिंकले.

जिन्नस
  • एक वाटी खमंग भाजलेला रवा
  • दोन चमचे तेल व एक चमचा तूप
  • एक मध्यम कांदा चिरून
  • चार हिरव्या मिरच्या, पेरभर आले, पाच-सहा कडीपत्त्याची पाने,
  • दोन सुक्या लाल मिरच्या, एक टीस्पून उडीद डाळ, १०/१२ मेथीचे दाणे
  • दोन चमचे काजूचे तुकडे( ऐच्छिक ), दोन चमचे कोथिंबीर
  • एक चमचा साखर व चवीनुसार मीठ
  • तीन वाट्या आधणाचे पाणी

मार्गदर्शन

कढईत रवा घेऊन मध्यम आचेवर दहा मिनिटे भाजावा. रव्याचा रंग बदलता नये परंतु तो खमंग भाजला जायला हवा. एकीकडे कांदा उभा पातळ/ बारीक , जसा आवडत असेल तसा चिरावा. हिरव्या मिरच्या मध्ये एक चीर पाडून घ्याव्यात. आल्याचे बारीक तुकडे करावेत. रवा हलका लागू लागला व त्याचा वास सुटला की कढईतून काढून घ्यावा. त्याच कढईत तेल घालून मोहरी, जिरे, हिंग, सुक्या व हिरव्या मिरच्या, कडीपत्ता, उडीद डाळ व मेथीचे दाणे घालून फोडणी करावी. हे सगळे दोन मिनिट परतल्यावर कांदा टाकावा. दोन मिनिटे कांदा परतून झाला की चवीनुसार मीठ व एक चमचा साखर घालून परतावे. तीन-चार मिनिटातच कांद्याला पाणी सुटू लागेल आता त्यावर भाजलेला रवा घालून हे सगळे मिश्रण एकजीव करावे. एकीकडे तीन वाट्या पाणी थोडे बुडबुडे येईतो गरम करून घ्यावे. रवा-कांद्याचे मिश्रणात काजूचे तुकडे घालून पुन्हा दोन मिनिटे परतून हे आधणाचे गरम पाणी त्यावर ओतावे. ( एकतर गॅस बंद करून ओतावे किंवा कढई उतरवून - सुरवातीला मिश्रण फडफडा उडते तेव्हा जरा सांभाळून करावे. ) मिश्रण व पाणी एकत्र होईतो ढवळून झाकण ठेवावे. तीन-चार मिनिटाने झाकण काढून एक चमचा साजूक तूप घालून पुन्हा दोन मिनिटे वाफ आणून गॅस बंद करावा. वाढताना पुन्हा एकदा ढवळून कोथिंबीर व लिंबू घालून गरम गरम वाढावे.

Friday, August 7, 2009

आम्ही तमाशाई अन बोचणारी शल्ये

ठाण्याच्या समर्थ भांडार समोरच...... बी केबिन वरून गोखले रोडवर येऊन मिळतो त्या भागात आता मोठा टॉवर झाला. पॉश दुकाने झाली. पण अगदी २००२ पर्यंत तिथे जुन्याच बिल्डिंग्ज होत्या. कल्चर-बरेच जुने पंजाबी सूटसचे दुकान व बी केबिनचा मधला हा पट्टा म्हणावा तर अगदी मोक्याच्या ठिकाणी पण थोडासा जुनाट. पायऱ्या चढून दुकानांमध्ये जावे लागते. इथे नेहमीच अनेक प्रकारचे फेरीवाले असत व अजूनही आहेत. नेमके साल आठवत नाही ( ९६-९७ असावे ) परंतु एका दुकानाचे काम चालू होते त्यामुळे बांधकामाचे सामान इतस्ततः विखुरलेले, त्यातच मजुरांचे संसार, पोरेबाळे नांदत होती. रस्ता हा सर्वांसाठी असल्याने ज्याला जमेल तसे हक्काने जो तो वापरत होता. कल्चरच्या भिंतीला पर्स, झोळ्या, झब्बे, बंड्या तस्तम टांगलेल्या याचे दोन-तीन विक्रेते असतात. बाकी भाजी-फळे, पिना-रबर-कानातले, कपबश्या, चिनी मातीचे सामान असणारेही आहेत. लेदर पर्स, पाकिटे व पासपोर्ट पाकीट याचेही दोघे तिघे आहेत. कसलीतरी सुटी होती म्हणून मी सकाळी अकरा-साडेअकराच्या सुमारास कल्चरपाशी पोचले. पूर्वी त्याशेजारी पॉप्युलर लायब्ररी होती. शिवाय भाजीपोळी, मेथी, डिंक लाडू ( दुकानाचे नाव मी विसरलेय आता-काहीतरी पोळीभाजी केंद्र .... ) टिपीकल पडवळ डाळिंब्या, फणसाची भाजी वगैरे प्रकार हमखास मिळतात तिथे. तर मी लायब्ररीत पुस्तक बदलले आणि गावदेवी मार्केट मध्ये जाऊन भाजी घ्यावी म्हणून निघाले होते.

चार पावले चालले तोच लहान मुलाचा किंचाळून रडण्याचा आवाज ऐकू आला. समोरच बरीच गर्दीही दिसली. काय झालेय, इतक्या जोरात कोण व का रडतेय पाहावे म्हणून डोकावले. अन अवाक झाले. ह्या बांधकाम करणाऱ्यातल्याच एकाचे पोर- जेमतेम दीड-दोन वर्षांचे असावे, गुटगुटीत, सावळेसे. त्याचा बाप पोकळ बांबूच्या फोकाने सटासट त्याला मारत होता. पायावर, हातावर, पाठीवर... फटका बसेल तिथे वळ उमटत होते अन पोर कळवळून किंचाळत होते. इतके लहान मूल देऊन देऊन असा काय त्रास देऊ शकते? शिवाय लहान असो मोठे असो हे असे रानटी मारणे. बापाकडे पाहिले तर आजूबाजूला जमलेली गर्दी पाहून तो अजूनच चेव चढल्यासारखा मारत होता. बरेच जण," ये काय पागल झालास का? कशाला मारतो आहेस, सोड त्याला..... " असे ओरडत होते पण कोणीही पुढे गेले नाही.

या पोराची आई कुठे आहे म्हणून मी शोधू लागले. ती पायरीवरच बांबूची टोपली विणत बसली होती. तिला म्हटले, " अग दिसत नाही का तुला? घे ना पोराला उचलून नाहीतर नवऱ्याच्या हातातली काठी तरी काढून घे." तर म्हणाली, " ताई अवो तो प्यालाय दारू, आता म्या मध्ये गेल्ये तर मलाच बडवेल. थांबल की थोड्यावेळाने, ते पोर काय मरतंय थोडंच. तुम्ही जावा. " हे ऐकून काही जण म्हणू लागले , " अरे हे यांचे दररोजचेच असणार. बेवडा मारून यायचा अन बायकोला नाहीतर पोरांना बडवायचे. मरो. आपल्याला फुकटचा त्रास. " तोवर त्याचे पोराला थांबून थांबून मारणे सुरूच होते. एवढे लोक जमलेत पण एका कोणाची छाती नाही आपल्याला आडवायची असे वाटल्याने किंवा काय विचार असतील कोण जाणे पण ते पोर कळवळले ना की बाप आसुरी आनंदाने हसत होता.

मस्तकात अगदी तिडीक गेली होती शिवाय ते वळ अन तळतळ पाहून असे वाटत होते त्याच फोकाने बापाला मनसोक्त बडवून काढावे. पण इतके जण पाहत असूनही पुढे जात नाहीयेत अन पोराचा बाप चांगला तगडा होता. न जाणो मलाही चार रट्टे ओढायचा हाही विचार नक्कीच डोकावला त्यामुळे पुढे जायची हिंमत होईना. तेवढ्यात तिरासारखा कुठूनतरी एक सहावी-सातवीतला शाळकरी मुलगा बापाजवळ पोचला अन लाकडी फूटपट्टीने बापाला व इतर आमच्या सारख्या ( फुकटचा तमाशा पाहत उभे असलेल्यांना ) काही कळायच्या आत सटासट आठ-दहा रट्टे त्याची असेल नसेल तेवढी ताकद काढून हातावर ओढले. अचानक झालेल्या हल्ल्याने बाप एकदम गांगरला खरा पण लागलीच सावरला. त्याने स्वतःच्या पोराला सोडले अन या पोराला धरले पण तोवर काही बघेही सरसावले होते. त्यांनी त्या मुलाला बाजूला करून बापाच्या दोन-चार कानाखाली वाजवल्या. लागलीच लहानग्याची माय आली धावत, " अवो सोडा त्यांना, कशापायी हाणताय ...... घ्येतच व्हते ना पोराला काढून. तुम्हा लोकास्नी लय हौसच दुसऱ्याच्या भानगडीत पडायची. जावा जावा.... घरला जावा. " असे ओरडत नवऱ्यालाच लोकांनपासून दूर करू लागली. लहानगे तसेच हुंदकत रस्त्यावर पालथे पडले होते.

गर्दी पांगली. मीही निघाले. इतक्या लहान मुलाला जे जमले ते आम्हा तमाशाई ५०/६० माणसांना जमू नये. खरेच सांगते लाज वाटली. तो आपल्याला मारील की काय ही भीती त्या लहानग्याच्या वेदनेपेक्षा मोठी ठरली. माझे पोर आहे त्याला मारीन / काहीही करेन तुम्ही कोण अडवणार असे तो म्हणेल असेही वाटून गेले होते. ते जे काय असेल ते असो, मी पुढे होऊन त्याचा हात धरून का थांबवले नाही...... हा इतका लहान मुलगा जे करून गेला ते अनेकांना करणे शक्य होतेच. अनेकदा या नसत्या काल्पनिक भित्या योग्य ती कृती गरजेच्या वेळी करायला अटकाव करतात . यावर मात करायला हवी. नाहीतर नुसते लांबून चुकचुकणारे गर्दीतले बघे बनून बनून अशी शल्ये वाढतच राहतील.


Thursday, August 6, 2009

कुळथाचे पिठले


जिन्नस

चार टेस्पून कुळथाचे पीठ
तीन चमचे तेल
एक मध्यम कांदा चिरून
दोन टेस्पून सुके खोबरे
दोन मध्यम लसूण पाकळ्या, दोन सुक्या लाल मिरच्या
सहा-सात आमसुले, एक चमचा जिरे
थोडीशी कोथिंबीर, चवीनुसार मीठ

मार्गदर्शन

सुके खोबरे, जिरे व सुक्या लाल मिरच्या भाजून घ्याव्यात. लसूण पाकळ्या व ह्या भाजलेल्या मिश्रणाची पूड करून घ्यावी. कढईत तेल घालून नीट तापले की नेहमीप्रमाणे मोहरी, हिंग व हळदीची फोडणी करून त्यावर कांदा घालून पाच मिनिटे परतावे. नंतर त्यात चार कप पाणी, केलेली पूड, आमसुले व मीठ घालून एकजीव करून मध्यम आचेवर उकळी फुटेपर्यंत ठेवावे. चांगले उकळले की गॅस लहान करावा. आता त्यात कुळथाचे पीठ घालून विरघळवावे. प्रथम गोळे गोळे होतील. मिश्रण एकजीव करत राहावे. बऱ्यापैकी गुठळ्या मोडल्या की पाच मिनिटे झाकण ठेवून एक वाफ आणावी. झाकण काढून हालवून पाहावे गुठळ्या मोडल्या जाऊन मिश्रण छान एकत्र झाले आहे असे वाटले की गॅस बंद करावा. नसेल तर पाण्याचा एक हबका मारून पुन्हा दोन-तीन मिनिटे ठेवावे. वाढताना कोथिंबीर घालून गरम तांदळाची भाकरी व भाजलेल्या पोह्याच्या पापडाबरोबर खायला द्यावे.

टीपा

हे मध्यम तिखट असते परंतु आवडीनुसार तिखटाचे प्रमाण वाढवता येईल. कुळथाचे पिठले अतिशय चविष्ट लागते. ज्यांना आवडते त्यांना अतिशय आवडते अन नाही त्यांना अजिबात आवडत नाही. चव डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला तर न आवडणाऱ्यांनाही आवडू शकते. ( स्वानुभव, )